नवी दिल्ली – देशात दर दहा वर्षांनी होणारे जनगणनेसह राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे (एनपीआर) काम यंदा करोनामुळे होणार नसून पुढील वर्षी हे काम होइल असे स्पष्ट झाले आहे.
दर 10 वर्षांनी होणारी भारताची जनगणना हे जगातील सर्वात मोठे प्रशासकीय व सांख्यिकी कार्य आहे. यासाठी 30 लाखांपेक्षा अधिक कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती संकलित करतात. यंदाच्या वर्षी हे काम 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या कालावधीत होणार होते. मात्र, करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने ते शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे, असे संकेत केंद्र सरकारनेच दिले आहेत.
जनगणनेच्या कामासाठी देशातील लाखो कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती जमा करत असतात. करोनाच्या काळात ही कामे हाती घेणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक ठरेल. मुळ वेळापत्रकानूसार जनगणना 1 मार्च 2021 रोजी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. तसेच एनपीआरमधील नोंदी अद्ययावत करण्यास काही राज्यांनी विरोध केला होता.
मात्र जनगणनेच्या कामास सर्व राज्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, आता करोनाच्या धोक्यामुळे या कामालाही विलंब होणार आहे.
या आधी 2010 साली एनपीआरमधील नोंदी नव्याने नोंदल्या गेल्या होत्या. त्यात 2015 साली काही बदलही करण्यात आले होते. या नोंदींत नागरिकांचे आधार क्रमांक तसेच मोबाइल क्रमांकांचाही समावेश करण्यात आला होता. यंदापासून एनपीआरमध्ये वाहन चालविण्याचा परवाना क्रमांक, निवडणूक ओळखपत्र असा गौष्टींचाही समावेश करण्यात येणार होता.