नवी दिल्ली – आज जागतिक नारळ दिन जगभर साजरा केला गेला. नारळाचे महत्त्व आणि त्याचे फायदे याबद्दल जगभर जागरूकता निर्माण करणे, हे हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दीष्ट आहे.
जगातील बहुतेक नारळ उत्पादक आशियाई आणि पॅसिफिक क्षेत्रात असल्यामुळेच आशियन आणि पॅसिफिक क्षेत्रातल्या देशांमध्ये प्रामुख्याने या दिवसाला विशेष महत्व आहे. जागतिक नारळ दिन पहिल्यांदा 2009 मध्ये झाला होता.
‘एशियन पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी’ अर्थात ‘एपीसीसी’च्या स्थापना दिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो आहे, संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगाच्या आशिया आणि पॅसिफिक (यूएन-ईएससीएपी) च्या प्रमुख अधिकारांतर्गत ‘एपीसीसी’ कार्यरत आहे.
यावर्षी ‘जग वाचविण्यासाठी नारळात गुंतवणूक करा’ ही जागतिक नारळ दिनाची संकल्पना आहे. भारतामध्ये नारळाच्या उत्पादनात केरळ अव्वल आहे, परंतु तामिळनाडू आणि कर्नाटक या क्षेत्रातही जोर धरत आहेत. तामिळनाडूमध्ये वार्षिक उत्पादन सुमारे दोन कोटी 17 लाख नारळ पिकत असून एकात्मिक नारळ लागवड योजनेसारख्या पुढाकाराने उत्पादकता वाढविण्यात येत आहे.