कोल्हापूर(प्रतिनिधी) – कोविड १९ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदाचा गणेशोत्सव लहान मोठ्या मंडळांनी साध्या पध्दतीने साजरा करावा. मुबंईतील मंडळांनी त्याला होकार दिला आहे. इतर जिल्ह्यांनी राज्य सरकारच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केले. कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर बुधवारी दुपारी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देसाई पुढे म्हणाले, मुंबईत संसर्ग टाळण्यासाठी २ किलो मिटर अंतराबाहेर जाण्यास लोकांना मनाई आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्वच मंत्री आपल्याला दिलेली जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडत आहेत. जिल्हयांच्या पालकमंत्र्यांचे कामही खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे. त्यामुळेच कोरोनाचा फैलाव रोखण्यास यश मिळाले आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व आरोग्य विभागाने अडीच ते तीन महिने डोळ्यात तेल घालून काम केल्यामुळे या साथीवर अटकाव आणला आहे.
आगामी गणेशोत्सव साजरा करताना कोणती खबरदारी घ्यावयाची यासाठी राज्य मंत्रीमंडळाने काही नियम व अटी घातल्या आहेत. एकीकडे सरकार कोरोनाचा अटकाव करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. लोकांना सोशल डिन्स्टन्स ठेवण्यासाठी सांगत आहे. त्यामुळे आगामी सण, उत्सव, यात्रा, जत्रा व सांस्कृतिक कार्यक्रमात लोकांनी नियम व अटींचे पालन करणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल जिल्हा पोलीस अधीक्षकांना तशा सुचना केल्या आहेत असेही देसाई यांनी सांगितले.
ई पास घेणाऱ्या व्यक्तींची आरोग्य तपासणी झालेली असते. त्यामुळे त्यांना एका जिल्ह्यातून दूसऱ्या जिल्ह्यात जाण्यापासून रोखता येत नाही. मात्र ई पास देण्यासाठी काही एजंट काम करीत आहेत, त्यातून आर्थिक नफा मिळवला जात असल्याचे पत्रकारांनी लक्षात आणून दिल्यानंतर असे काही प्रकार खरोखर घडत असतील तर ते आमच्या समोर आणावेत त्यांच्यावर थेट व गंभीर कारवाई केली जाईल असेही देसाई यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला खासदार धैर्यशिल माने, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार उल्हासदादा पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशखमुख, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश पाटील आदी मान्यवर हजर होते.
पडळकरांचा विषय संपला
गोपिचंद पडळकरांचे विधाने त्याचे व्हिडीओ रेकॉर्डीग तपासण्याचे आदेश आपण दिले होते. याचे काय झाले? असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ना.देसाई म्हणाले शरद पवार साहेबांनी तो विषय संपवलेला आहे. त्यामुळे त्याला आम्ही महत्व देत नाही. पुणे व बीड मध्ये त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. पोलीस महासंचालकांचा अहवाल आल्यानंतर आपणही निर्यण घेऊ.
उस्मानाबाद प्रकरणाची चौकशी
उस्मानाबादमध्ये एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची जल्लोषात मिरवणूक काढल्याचे समजते. ही माहिती बुधवारी सकाळी मला समजली आहे. तेथील पोलीस अधीक्षकांना चौकशी अहवाल तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीत जे दोषी येतील त्यांची गय केली जाणार नाही. असे देसाई यांनी सांगितले.