जय महाराष्ट्र युवक मंडळाचा अनोखा उपक्रम
पुणे – शहरातील करोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने होत असलेली वाढ लक्षात घेऊन शुक्रवार पेठेतील जय महाराष्ट्र युवक मंडळाने यंदा दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रक्तदानाचा अनोखा उपक्रम राबविला.
मंडळाचे अध्यक्ष सौरभ पवार याबाबत माहिती देताना म्हणाले, ‘आमच्या मंडळातील तरुण फळीने आता उत्सवाची धुरा हातात घेतलेली आहे. करोनामुळे जग बदलत असताना आपणही मंडळाच्या वतीने काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणावा या हेतूने आम्ही या रक्तदान शिबिराचे आयोजन केले. ज्येष्ठांनीही त्याला लगेचच दुजोरा दिला व आम्ही कामाला सुरुवात केली.’
मंडळाने यंदाच्या वर्षी केवळ दहीहंडी उत्सव रद्द केला नाही, तर रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आपल्यातील सामाजिक बांधिलकीची देखील जाणीव करून दिली. या रक्तदान शिबिरास परिसरातून उत्तम प्रतिसाद लाभला. दिवसखेर 83 बाटल्या रक्ताचे संकलन झाल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली.
विशेष बाब म्हणजे रक्तदात्यांचे सरासरी वय हे केवळ २५ ते ३० वर्षे असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. ‘यातूनच आमच्या तरुण पिढीला असलेल्या सामाजिक जाणिवेचे दर्शन होते,’ असे सौरभ पवार म्हणाले. रक्तदान शिबिरास रुबी हॉल क्लिनिकतर्फे वैद्यकीय सहकार्य लाभले.