नसरापूर: नसरापूर गावातील चेलाडी चौक परिसरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. परिणामी, परिसरात वाहनचोरी व अनुचित प्रकारांमध्ये वाढ झाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून चेलाडी चौकात दुचाकी चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या असून, रात्रीच्या वेळी काही संशयास्पद हालचाली देखील निदर्शनास आल्या आहेत. परिसरात अपघाताची शक्यता देखील वाढली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे घटनांवर नियंत्रण ठेवणे आणि तपास करणे राजगड पोलिसांना कठीण बनले आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक राजेश कदम, सुशील विभुते, प्रज्योत कदम व सूरज धोत्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “चेलाडी परिसरात जर कोणताही अनुचित प्रकार घडला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी नसरापूर ग्रामपंचायतीची असेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, नसरापूरचे विद्यमान उपसरपंच नामदेव चव्हाण यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले आहे की, चेलाडी चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे आजच दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात येतील. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून, तत्काळ अंमलबजावणीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
गावातील सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा ही अत्यंत महत्त्वाची असून, ती कायमस्वरूपी कार्यरत राहावी, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.