नवी दिल्ली : सुमारे 144 कोटी रुपयांच्या बांबू खरेदी गैरव्यवहाराच्या तपासादरम्यान सीबीआयकडून हिंदुस्थान पेपर कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरच चौकशी केली जाणाऱ् आहे. कंपनीचे माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या एफआयआरमध्ये कंपनीचे तत्कालिन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एमव्ही नरसिंहा राव, कंपनी सेक्रेटरी एलआर एकनाथ आणि वरिष्ठ अधिकारी एसएन भट्टाचार्य, अमिताभ बॅनर्जी, बिप्लब चौधरी, पी.के. भूषण, एचएन बरुआ आणि मोहन झा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय “द हिल ट्रेड एजन्सी’ आणि “आरएस गांधी’ या कंपन्यांच्या मालकांविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कागद उत्पादनासाठी लागणाऱ्या बांबूची खरेदी करण्याच्या हेतूने “एचपीसीएल’ने दिमा हसव ऍटोनॉमस कौन्सिलबरोबर करार केला होता. या कराराचा उपकरार आरएस गांधी कंपनीबरोबर केला गेला होता. मात्र वर्तमान कराराची मुदत संपण्यापूर्वी वारेमाप किंमती वाढवून “एचपीसीएल’ने कराराचे नूतनीकरण केले. खरेदी किंमतीत वारंवार वाढ केल्यामुळे “एचपीसीएल’चे 46.47 कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा दावा सीबीआयने केला आहे.