नवी दिल्ली – अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे पण आज त्या घटनेला 145 दिवस होऊनही सीबीआयचा तपास पुर्ण झालेला नाहीं किंवा त्यांनी त्या संबंधात आपला निष्कर्षही काढलेला नाही. या पार्श्वभूमीवर अनेकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या संबंधात भाजपचेच खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी हा तपास कुठवर आला आहे अशी विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना या प्रकरणाचा सर्वच बाजूने तपास सुरू असल्याचे उत्तर सीबीआयकडून देण्यात आले आहे. तपासाच्या संबंधात कोणतीही शक्यता फेटाळण्यात येत नाही असेही सीबीआयने म्हटले आहे.
डॉ स्वामी यांनी पंतप्रधान कार्यालयालाच पत्र पाठवून या प्रकरणाचा तपास कोठवर आला आहे अशी विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना सीबीआयने, म्हटले आहे की आधुनिक तंत्रज्ञान वापरून या प्रकरणाचा तपास केला जात असून त्यासाठी अनेक क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.
तपास पथकातील अधिकाऱ्यांनी अलिगड, फरीदाबाद, हैदराबाद, मुंबई, पनेसर,पाटणा आदि सर्व ठिकाणी जाऊन तपास केला आहे असेही सीबीआयने या पत्रात म्हटले आहे. सुशांतसिंह याने आत्महत्याच केली होती असा निष्कर्ष एम्सच्या चौकशी पथकाने या आधी काढला आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनीही सुशांतसिंह याने आत्महत्या केली होती की त्याची हत्या झाली हे लवकर स्पष्ट करावे अशी जाहींर मागणी केली आहे.