नवी दिल्ली : प्रसिद्ध कामगार नेते दत्ता सामंत् यांच्या हत्येचे प्रकरण उकरून काढण्याचे सीबीआयने ठरवले आहे. दत्ता सामंत यांची 1997 साली मुंबईत हत्या झाली होती. या हत्येमध्ये गॅंगस्टर छोटा राजन हा संशयित आहे. छोटा राजनचा सहभाग असलेल्या खंडणी, हत्या आणि धमक्यांशी संबंधित 10 प्रकरणे सीबीएआयकडे आहेत. ही प्रकरणे 1992 पासून सुमारे 14 वर्षांच्या कालखंडामध्ये घडलेली आहेत, असेही अधिकऱ्यांनी सांगितले.
कामगार संघटनेचे प्रभावी नेते दत्ता सामंत यांची 16 जानेवारी 1997 रोजी हत्या करण्यात आली होती. ते मुंबई येथील पंत नगर येथील कार्यालयाकडे जीपमधून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर
17 गोळ्या झाडल्या होत्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
1981 मध्ये मुंबईतील गिरणी कामगारांचा वर्षभराचा संप दत्ता सामंत यांनी घडवून आणला होता. त्यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता आणि 2015 मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते. राजनला इंडोनेशियात पकडल्यानंतर या आणि इतर 70 खटल्यांबद्दल त्याला भारताच्या स्वाधीन करण्यात आले होते. दत्ता सामंत यांच्या कथित मारेकऱ्यांपैकी विजयकुमार चौधरी हा 2007 मध्ये कोल्हापूरमध्ये मुंबई पोलिसांबरोबरच्या चकमकीमध्ये मारला गेला होता.
या प्रक्रियेनुसार सामंतच्या चालकाच्या निवेदनाच्या आधारे सीबीआयने मुंबई पोलिसांची एफआयआर ताब्यात घेतली असून हे प्रकरण पुन्हा नोंदविण्यात आले आहे. खंडणी, भांडुप दंगल आणि 1992 मधील खून, 2004 मध्ये अंधेरी येथील रहिवाशांवर गोळीबार आणि खून करण्याचा प्रयत्न आदींचा सीबीआयने दाखल केलेल्या अन्य प्रकरणांमध्ये समावेश आहे. भारतात 2015 मध्ये प्रत्यार्पण झाल्यानंतर एका प्रकरणात दोषी ठरलेला छोटा राजन दिल्लीच्या तिहार तुरूंगात आहे.