नवी दिल्ली – कोविड-19 च्या विरोधात स्वदेशी औषधाच्या निर्मितीला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र अशा स्वदेशी औषधाबाबत संशोधकांनी सावध भूमिका घेतली आहे. स्वदेशी औषध विकसित करण्यात आल्याची माहिती “आयसीएमआर’ने अलिकडेच केली आहे. मात्र असे औषध विकसित करण्यासाठी कित्येक महिने, कदाचित वर्षेही लागू शकत असताना देशांतर्गत संस्थांद्वारे अल्पावधीतच करोनावर प्रभावी औषध विकसित केले जाण्यावर संशोधकांकडून सावध प्रतिक्रिया दिली गेलेली आहे.
करोनावरील औषध 15 ऑगस्टपर्यंत आणले जाईल, असे “आयसीएमआर’ ने म्हटले आहे. त्याचबरोबर अहमदाबादेतील झायडस कॅडिला या संस्थेनेही आपल्या औषधाच्या मानवी चाचणीला भारतीय औषध महानियंत्रकांकडून परवानगी मिळाल्याचे म्हटले आहे.
मात्र अशा प्रकारे चार आठवड्यांत लसीची चाचणी घेणे, सुरक्षितता, रोगप्रतिकारक शक्ती आणि कार्यक्षमतेसाठी शक्य नाही, असे व्हायरोलॉजी आणि वेलकम ट्रस्ट, डीबीटी इंडिया अलायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शाहिद जमील यांनी म्हटले आहे. रोगप्रतिकारकशक्ती परघटकांच्या संपर्कानंतर निर्माण होते. ती तपासण्यासाठी अनेक आठवडे लागू शकतात, असे ते म्हणाले.
तर अशाप्रकारे करोनाविरोधातील लस मिळणे खूप छान आहे. त्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आवश्यकच आहे. मात्र आपण लस बाजारात आणण्याची घाई तर करत नाही आहोत ना, अशी शंका व्हायरोलॉजीस्ट उपासना रॉय यांनी व्यक्त केली. अनावश्यक घाईमुळे लसीच्या गुणवत्तेबाबत काही तडजोड व्हायला नको, असे त्या म्हणाल्या.