दैनिक प्रभातच्या पाठपुराव्याला यश : नागरिकांची परवड थांबणार
नगर – गावच्या विकासात रस्त्याची महत्वाची भूमिका असते. रस्ते हे गावच्या विकासाच्या धमण्या असतात. मात्र, तालुक्यातील आदर्श गाव व अनेक पुरस्कार प्राप्त मांजरसुंब्यातील डोंगरगण-मांजरसुंबा शिव रस्त्याची दुरावस्था झाली होती. याबाबत “दैनिक प्रभात’ ने रस्त्याच्या दुरावस्थेबाबत पाठपुरावा केला होता. याबाबत पाठपुराव्याल यश आले असून शिवरस्त्याच्या कामास सुरुवात झाली आहे.
मांजरसुंबा गावाला राज्यसरकारचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे आदर्श गाव म्हणून या गावाकडे पाहिले जात आहे. मात्र, गावातील वाड्यावस्थांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. काळा-मळा वस्ती, गारामाथा या दोन्ही वस्तीवर 200 ते 300 ग्रामस्थांची लोकवस्ती आहे. तसेच अनेक ग्रामस्थांचा दुध व्यावसाय आहे. पावसाळ्यात या व्यावसायीकांना डोक्यावर दुधाचे कॅन घेवून पायपीटी करावी लागत असे.
काळी माती असल्याने पावसाळ्यात रस्त्या चिखलमय झाल्याने अनेक नागरिक घसरून पडलेल्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे 1.5 कि.मी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरु झाले आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांची पिके ते निघाल्यावर ते काम सुरु करण्यात येणार आहे.