पुणे – हडपसर, मांजरी आणि पिंपरी-चिंचवड उपनगरांतील काही भागांत “कोयता गॅंग’ने गेल्या महिन्याभरापासून धुमाकूळ घातला आहे. हे गुन्हेगार रात्री-अपरात्री कोयता दाखवून चोरी, वाहनांची तोडफोड, लुटमार करत आहेत. त्यांच्यावर तत्काळ मोक्का लावा, तडिपार करा, अशी मागणी सामान्य नागरिकांमधून होत आहे. सध्या शहर आणि इतर परिसरात कोयता गँगने प्रचंड धुडगूस घातला असून, सामान्य पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गॅंगमधील काही गुंडांच्या पोलिसांनी देखील मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान, पुण्याचे नवे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या समोर या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठीच मोठं आव्हान असून यासाठी आता त्यांनी नवीन शक्कल लढवली आहे. शहरात गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी कारवाही केल्यास पोलिसांना बक्षी देण्यात येणार आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे सध्या शहरात आणि परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
1) शस्त्र अधिनियम कलम 3, 25 नुसार कारवाई – 10 हजार रुपयांचे बक्षीस
2) शस्त्र अधिनियम कलम 4, 5 नुसार कारवाही – 3 हजार रुपये बक्षीस
3) फरार आरोपी पकडणे – 10 हजार रुपये बक्षीस
4) पाहिजे असलेले आरोपी (WANTED) पकडणे – 5 हजार रुपये बक्षीस
5) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोक्का) – 5 हजार रुपये बक्षीस
6) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 नुसार कारवाई केल्यास – 2 हजार रुपये बक्षीस
7) महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती विधायक कृत आळा एनपीडीपी – 5 हजार रुपये बक्षीस
‘जमत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा’ – सुप्रिया सुळे
“राज्यात सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न समोर आले आहेत. दौंडमधली गुन्हेगारी, खून, पुण्यातील कोयता गँग, महिलांवर अत्याचार हे सातत्याने राज्यात होत आहे. राज्यात एवढं सगळं होतंय हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. त्यामुळे जमत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा’. अशी मागणी काहीदिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी केली होती.