पुणे – सर्वसाधारणपणे नव्वदच्या दशकात भारतात पर्यटन व्यवसायाला चालना मिळायला सुरु झाली आणि ट्रॅव्हल्स – टुरिझमच्या कंडक्टेड टूर्स आयोजित करण्याची फॅशन निघाली. “गॉडस् ओन कंट्री-केरळा,’, “रंगीला राजस्थान’, “पधारो गुजरात’ पासून अगदी “येवा कोंकण आपलाच असां…’ पर्यंत विविध पर्याय उपलब्ध झाले. त्याचबरोबरीने परदेशी पर्यटनाचेही पर्याय सादर झाले. महाराष्ट्रातही गडकिल्ल्यांचे पर्यटनाच्या अनुषंगाने खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून विकसन केले जाणार आसल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यानुसार देशात सध्या कुठे आणि कशा प्रकारे असे राजवाडे आणि किल्ले यांचे विकसन करण्यात आले, ते पाहाणे रंजक ठरणार आहे.
पर्यटन व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने काही वर्षांपूर्वी “अतुल्य भारत’ नावाची जनजागृती मोहीम उघडली होती. त्याच्या जाहिरातींमधली काही वाक्ये खूप विचार करायला लावणारी होती. “आम्ही मान झुकवली… श्रद्धेने… आणि शरमेने…’ अशी वाराणसीच्या गंगेच्या घाटांची जाहिरात करण्यात आली होती. हे चित्र बदलायचे असेल, तर सर्वसामान्यांनीच पुढे येत आपला वारसा, धर्म, परंपरा, कला हे सारं जपलं पाहिजे.
मग यातूनच राजस्थान, केरळ, सिक्कीम आणि उत्तराखंडसह देशाच्या विविध भागांत असलेल्या ऐतिहासिक किल्यांना, राजवाड्यांना आणि विविध वास्तूंना पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीनं रुपांतरित करण्यात आलं यात अर्थातच ऐतिहासिक परंपरेचा अवमान करण्याचा हेतू नव्हताच; हेतू इतकाच होता, “तुम्हीही या आणि आमची भूमी किती समृद्ध होती, ते पहा. आमच्या इथला राजा कसा आणि किती प्रजाहितदक्ष होता, ते अनुभवा. हा त्याचा राजवाडा, ही त्याची हवेली, हा त्याचा किल्ला. तुम्हीही त्याचा अनुभव घ्या.’ देशभर अनेक राजवाडे आणि किल्ले पर्यटनासाठी खास प्रकारे विकसित करण्यात आली आहेत. एकट्या राजस्थानचा विचार केला तर राज्यातल्या 23 हून अधिक अशा हेरिटेज हॉटेल्सनी हजारो जणांना रोजगार दिला असून राज्याच्या तिजोरीतही किमान 8.5 टक्क्यांची भर या पर्यटन व्यवसायाने घातली आहे. त्यात विदेशी चलनाचा वाटाही मोठा आहे. एक नजर अशा काही उल्लेखनीय हॉटेल्सवर…
अहिल्या फोर्ट, माहेश्वर, मध्य प्रदेश
महाराष्ट्र कन्या आणि दूरदृष्टीच्या राज्यकर्त्या असलेल्या अहिल्याबाई होळकर यांनी मध्य प्रदेशच्या माळवा प्रांतात असलेल्या माहेश्वर या नर्मदातटीच्या गावात बांधलेला अहिल्या वाडा म्हणजेच आजचा अहिल्या फोर्ट होय. अहिल्याबाईंनी या ठिकाणी वर्ष 1765 ते 1796 दरम्यान राज्य केले. तर वर्ष 200 मध्ये प्रिन्स रिचर्ड होळकर यांनी या अहिल्या वाड्याचे रूपांतर एका राजेशाही हॉटेलमध्ये केले. अठराव्या शतकात बांधण्यात आलेल्या या तीन एकरावरील वाड्यात सध्या 22 राजेशाही रुम्स पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. राजदरबार हॉल, लक्षवेधी कारंजी, उत्तम लॅण्डस्केप गार्डन आणि समोर दिसणारे नर्मदेचे विशाल पात्र अशी निसर्गरम्य पार्श्वभूमी या वाड्याला लाभली आहे.
हॉटेल डिग्गी पॅलेस, जयपूर, राजस्थान
खंगारोट राजपूत ठाकूर परिवाराचा “ठिकाणा’ म्हणून नावारुपाला आलेली डिग्गी पॅलेस हवेली म्हणजे जयपूरच्या मध्यवस्तीतील एक आलिशान हॉटेल आहे. वर्ष 1860 मध्ये ठाकूरसाहेब प्रतापसिंगजी डिग्गी यांनी बांधलेली ही दुमजली हवेली म्हणजे गेली 12 वर्षे जगभर नावारुपाला आलेल्या जयपूर आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनाचे मुख्य केंद्र बनली आहे. विशेष म्हणजे डिग्गी कुटुंबाचे वारसही या हवेलीमध्ये राहतातच; शिवाय वापरात नसलेल्या भागात एका आलिशान हेरिटेज हॉटेलची उभारणी वर्ष 1991 मध्ये करण्यात आली आहे.
रावला नरलाई, पाली
जयपूर आणि उदयपूरच्या दरम्यान पाली जिल्ह्यात देसुरी गावाजवळच्या टेकडीवर वसलेले रावला नरलाई हे असेच एक अप्रतिम ठिकाण आहे. राणकपूरपासून अवघ्या 36 किमी अंतरावर सतराव्या शतकात बांधण्यात आलेल्या आदिनाथ हिंदू आणि महावीर जैन मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेल्या टेकडीवर रावला नरलाई हॉटेल विकसित करण्यात आले आहे. या टेकडीवर असलेल्या एका पारंपरिक गढीची इमारत हॉटेलसाठी रुपांतरीत करण्यात आली. स्विमिंग पूलसह अनेक आलिशान सोयीसुविधांनी युक्त हे ठिकाण अल्पावधीत पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरले आहे.
गजनेर पॅलेस, बिकानेर, राजस्थान
“चली आई मैं अकेली बिकानेरसे…’ या गाण्याने सर्वांना ज्ञात असलेल्या बिकानेरमधली गजनेर हवेली म्हणजे बिकानेरचे राजे सर गंगा सिंग यांनी बांधलेला राजवाडाच आहे. गजनेर तलावाच्या परिसरातल्या या हॉटेलचे क्षेत्र सहा हजार एकर इतके असून, पूर्वीच्या काळी राजा शिकारीला अरण्यात गेला, की त्याला राहण्याची सोय हवी, म्हणून हा राजवाडा विकानेरपासून 36 किमी अंतरावर बांधला गेला. ब्रिटीश अमदानीत अनेक ब्रिटिश अधिकारीही शिकारीसाठी आले की ते राजाचा पाहुणचार घेत असत. आजही इथे ऐतिहासिक रेल्वे स्टेशन, भारतातला एक विस्तीर्ण वटवृक्ष आणि अनेक शाही सुविधांनी युक्त रुम्स पहायला मिळतात.
देवीगड पॅलेस, उदयपूर, राजस्थान
आरवली पर्वतरांगेमध्ये उदयपूरपासून अवघ्या 28 किमी अंतरावर दिलवाडाच्या जवळ असलेला देवीगड पॅलेस म्हणजे 18 व्या शतकातील राजा सज्जासिंगचे निवासस्थान होय. महाराणा प्रतापसिंगचा सरदार असलेल्या सज्जासिंगने मुघल सम्राट अकबराच्या विरोधात राणा प्रतापच्या बाजूने मोठे शौर्य दाखवले होते, ती वर्ष 1576 मधली हल्दीघाटीची लढाई आपल्या स्मरणात असेलच. नंतर वर्ष 1760 मध्ये रघुदेवसिंगने येथे राज्य केले. वर्ष 1960 नंतर या राजवाड्याची पडझड झाली आणि दुर्लक्षामुळे दुर्दशाही. मात्र, वर्ष 1984 मध्ये शेखावती भागातील पोद्दार समूहाने या राजवाड्याचे रुपांतर एका आलिशान हॉटेलमध्ये केले. पण त्यासाठी 15 वर्षांचा कालावधी जावा लागला.
उमेद भवन पॅलेस, जोधपूर, राजस्थान
जोधपूरचे राजे उमेदसिंह यांचे पारंपरिक निवासस्थान असलेला हा राजवाडा वर्ष 1972 मध्ये ताज हॉटेल्सने एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रूपांतरीत केला. ब्रिटिश आर्किटेक्ट हेन्री लॅंकेस्टरने डिझईन केलेल्या या राजवाड्यात किमान 347 रुम्स, 26 एकरातली या वास्तूला 15 एकरांची विस्तीर्ण बाग असून एक आलिशान संग्रहालय, स्क्वाश कोर्ट, विन्टेज कार ड्राईव्ह अशा सुविधांनीयुक्त असलेले हे पॅलेस हॉटेल म्हणजे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा संगम मानले जाते.
ताज लेक पॅलेस, उदयपूर
उदयपूरच्या लेक पिचोला नावाच्या रमणीय तलावाच्या मधोमध असलेल्या जग निवास नावाच्या बेटावर वसलेले लेक पॅलेस म्हणजे मेवाडच्या राजघराण्याचे परंपरागत निवासस्थान होय. अठराव्या शतकात तलावात जगत सिंग दुसरा या मेवाडच्या 63 व्या पिढीच्या महाराजाच्या काळात बांधण्यात आलेल्या या राजवाड्याचे आलिशान हॉटेलमध्ये रुपांतर वर्ष 1971 मध्ये करण्यात आले.
चार एकरांवर विस्तारलेल्या या राजवाड्यामध्ये एकूण 77 पेक्षा जास्त रुम्स असून अत्यंत अप्रतिम भोजन, संगीत मैफिली आणि राजेशाही आदब असलेला कर्मचारी वर्ग, ही इथली वैशिष्ट्ये आहेत. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले असून, ब्रिटीश गव्हर्नर लॉर्ड कर्झन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ, हॉलिवूड स्टार विवियन ली, ज्युलिआ रॉबर्टस, अमेरिकन फर्स्ट लेडी जॅकलीन केनेडी, इराणचे शाह अशा असंख्य मान्यवरांनी इथल्या पाहुणचाराचा अनुभव घेतला आहे.
शिवछत्रपतींविषयी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये असलेला आदरभाव आणि श्रद्धा याचा विचार राज्य शासनाने करणे आवश्यक आहे. प्रत्येक किल्ल्याला मोठा इतिहास आहे, मग तो किल्ला छोटा आहे की मोठा असा प्रश्नच निर्माण होत नाही. छत्रपतींचा पराक्रम, शौर्य आणि मावळ्यांच्या बलिदानाचे संदर्भ या किल्ल्यांशी जोडले आहेत. या किल्ल्यांचे संवर्धन करताना कोणत्याही ऐतिहासिक संदर्भांची मोडतोड होणार नाही, भावनांना ठेच पोहोचणार नाही आणि नागरिकांच्या भावनांची कदर केली जाईल, असे शासनाने पाहणे गरजेचे आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने असा कोणताही प्रकल्प राबवताना अशा ऐतिहासिक किल्ल्यांवर विवाह समारंभ-पार्ट्या होणार नाहीत, याविषयी काळजी घेण्याचे आवाहन मी या राजघराण्याचा घटक म्हणून करतो आहे.
– शिवेंद्रराजे भोसले, आमदार, सातारा
एकूणच किल्ल्यांसारख्या वास्तूंचे जतन होणे, करणे आवश्यक आहेच. परंतु या वास्तूचे पावित्र्य राखतानाच भावनेच्या आहारी न जाता व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. पर्यटनाच्या विकासासाठी त्याचा उपयोग होईल आणि वास्तूची महतीही सर्वसामान्यांपर्यंत सहजगत्या पोहोचेल.
– सुधन्वा रानडे, राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संचालक
किल्ल्यांच्या विषयात संरक्षित आणि असंरक्षित असे दोनच प्रकार आहेत. 1961 पासून किल्ले संरक्षणाला सुरुवात झाली. मात्र त्यावेळी 48 च किल्ले संरक्षित झाले. त्यानंतर 2015 मध्ये राज्य सरकारने “किल्ले गडसंवर्धन समिती’ सांस्कृतिक विभागांतर्गत स्थापन करण्यात आली. त्यानंतर आणखी 83 किल्ल्यांची यादी तयार करून देण्यात आली. “हेरिटेज टुरिझम’ अंतर्गत हा प्रकल्प कॅबिनेटने जाहीर केला. परंतु नक्की त्यामध्ये काय करणार हे पाहिले पाहिजे. किल्ल्यांवर काहीही बांधकाम करायचे झाल्यास त्याला पुरातत्त्व खात्याची परवानगी ही लागतेच. पर्यटन विकास महामंडळाने या समितीला किंवा पुरातत्त्व विभागाशी समन्वय राखणे अपेक्षित होते. त्यांनी परस्पर धोरण जाहीर केले. लग्न, समारंभ होणार वगैरे हा विपर्यास आहे. परंतु प्रत्यक्षात असे काही बांधकाम गडांवर होऊच शकणार नाही. जास्तीत जास्त तेथे तंबू बांधता येऊ शकतात. तेही परवानगीनेच. महाराष्ट्रात जे किल्ले बांधले गेले ते लढण्यासाठीच बांधले. राजाराम महाराजांचे सचिव रामचंद्रपंत अमात्य यांचे एक आदेशपत्र आहे. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितले होते की, तटबंदी, बुरूज वगैरे वगळता अन्य पक्की बांधकामे करू नये. मुळात या विषयात भावनिक होऊन चालणार नाही. जे किल्ल्यांची खरेच तटबंदी, बुरुज शिल्लक आहेत तेथे काहीतरी ऍक्टिव्हिटी सुरू केली तर पर्यटकांचे त्याच्याकडे लक्ष जाईल.
– डॉ. सचिन जोशी, किल्ले गडसंवर्धन समितीचे सदस्य
राज्यातील 82 प्रमुख किल्ले हे केंद्र आणि राज्य सरकारच्या पुरातत्त्व खात्याकडे संरक्षित आहेत. त्या किल्ल्यांची स्मारक म्हणून नोंद आहे. मात्र अन्य किल्ल्यांचे “अ’, “ब’, “क’, “ड’ असे भाग केले आहेत. त्यातील काही किल्ले वनखात्याच्या, काही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आणि काही पर्यटन विभागाच्या अंतर्गत आहेत. पर्यटन विभागाच्या अखत्यारित असलेल्या किल्ल्यांमध्येही त्यांना काही पर्यटनाच्या दृष्टीने सुधारणा करायची तर त्यात तांत्रिक अडचणी येतात. पर्यटकांना त्याची महती कळावी या दृष्टीने या किल्ल्यांचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर दुर्लक्षा अभावी या किल्ल्यांचा ऱ्हास होईल. यातील बहुतांश किल्ले छोटे असून त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. रोजगार निर्मितीही व्हावी हा उद्देश राज्यसरकारच्या प्रकल्पात आहे. यामध्ये सुवर्णमध्य गाठताना काही दुर्गप्रेमी संघटनांच्या मदतीने आणि कंपन्यांमधील सीएसआर फंडाच्या माध्यमातून या किल्ल्यांचा विकास केला जावा. हॉटेल, संग्रहालय किंवा अन्य पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या विधायक गोष्टींची निर्मिती येथे केली जावी. हे किल्ले जतन होण्याच्या दृष्टीने केलेला हा प्रयत्न चांगला आहे. किल्ल्यांचा ऱ्हास वाचवण्यासाठी एक चांगला विचार घेऊन पुढे जावे.
– पांडुरंग बलकवडे, इतिहास संशोधक