मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली जात ब्राह्मण असल्याने टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रात जात महत्त्वाचा विषय कधीच राहिलेला नाही असं म्हटलं आहे. तसंच ब्राह्मण असल्याने त्यांच्यावर खापर फोडले जात आहे असे आपल्याला वाटत नसल्याचेही ते बोलले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.
संजय राऊत यांनी म्हटले की, “मला असं वाटत नाही. महाराष्ट्रात दलित, मुस्लिम मुख्यमंत्री झालेले आहेत. महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री द्यायचे कार्य, धाडस बाळासाहेब ठाकरेंनी दाखवले होते. बाळासाहेबांनी महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले. एक ब्राह्मण जे चार वर्षांपेक्षा जास्त काळ राहिले आणि दुसरा मराठा मुख्यमंत्री. महाराष्ट्रात जात महत्त्वाचा विषय कधीच राहिलेला नाही”.
“जेव्हा तुम्ही लोकांना समजावू शकत नाही तेव्हा त्यांना गोंधळात टाका असा एक सिद्धांत आहे. मग कसंही करुन हे मागच्या सरकारच्या माथी कसं मारायचं सुरु होतं. दुर्दैवाने हे बोलणं मला शोभत नाही पण आज स्पष्टपणे सांगतो. काही बोटावर मोजण्याइतके लोक आहेत ज्यांना असं वाटतं की, माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं. काहीजण असा प्रयत्न करतात. पण मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या परसवण्याचं काम करणारे यशस्वी होणार नाही,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.