कोरड्या तलावाबाबत राज्यकर्ते निष्क्रिय : पाणी सोडण्याच्या लेखी पत्राला मूठमाती
पळसदेव- इंदापूर तालुक्यातील तलाव ऐन पावसाळ्यात कोरडे असल्याने शेतकरी पाण्यासाठी तहानलेला आहे. तालुक्यात पावसाने दांडी मारल्याने इंदापूर तालुक्यातील काही गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
एकीकडे महापूर आणि दुसरीकडे कोरड्या तलावाची विदारक स्थिती असताना राज्यकर्ते निष्क्रिय बनल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक आणि शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. तलावात पाणी नसल्यामुळे इंदापूर तालुक्यातील वन्यप्राणी पिण्याच्या पाण्यासाठी कासावीस होत आहेत. इतकी विदारक स्थिती असताना तालुक्यातील राज्यकर्ते हातावर घडी आणि तोंडावर बोट चिडीचूप बसल्याचा संताप व्यक्त होत आहे.
पुणे शहर व परिसरात दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणे फुल्ल झाली आहेत. उजनी धरण देखील शंभर टक्के भरले आहे. मात्र, इंदापूर तालुक्यात पावसाने चांगलीच ओढ दिल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. इंदापूरच्या दोन्ही बाजूला पूर परिस्तिथी निर्माण झाली आहे. उजनी धरण फुल्ल झाले आहे. नीरा नदीला पूर आल्याने अनेकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची वेळ आली होती. सर्वच धरणातून नदीत पाणी सोडण्यात येत आहे. मात्र अनेकदा मागणी करूनही इंदापूर तालुक्यातील तलाव अद्याप कोरडेच आहेत. लाखो क्यूसेक पाणी उजनीतून कर्नाटकात वाहत आहे. वन्य प्राण्यासाठी तरी धरणात पाणी उपलब्ध असताना तळी भरण्यात येत नाही. त्यामुळे शेतकरी चांगलाच संतापला आहे.
तालुक्यातील आजी- माजी आमदार इंदापूर तालुक्याच्या पाण्यावर जोरदार भाषणे करताना दिसत आहेत. मात्र प्रत्यक्षात काम होताना दिसत नाही. त्यामुळे केवळ पोकळ आश्वासनाशिवाय जनतेच्या पदरात काहीच येत नसल्याचे चित्र आहे. पाणी उपलब्ध असताना देखील आम्हाला मिळत नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पळसदेव तलावासह इंदापूर तालुक्यातील सर्वच तलाव तरी तातडीने भरून द्यावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
- आमदारांचे पत्र धुडकावले?
आमदार दत्तात्रय भरणे यांनी लेखी पत्र देऊनही पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते यांनी लेखी पत्र देऊन शेटफळ तलाव, वाघाळे, झगडेवाडी, वरकुटे, गोकळी, दगडवाडी (शिवकालीन) तलाव, अंथुर्णे तलावात पाणी सोडण्याची मागणी केली आहे. तरीही यावर कार्यवाही झाली आहे. सध्या पावसाळ्यातच हे तलाव कोरडेच पडले आहेत. आमदार भरणे यांनी लेखी पत्रात पळसदेव तलावात पाणी सोडण्याचा उल्लेख केला आहे. पळसदेव परिसरातील 500 ते 600 एकर क्षेत्र अवलंबून आहेत. याशिवाय या भागात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्याचा वावर आहे. वन्य प्राण्यांना पाण्यासाठी पुणे- सोलापूर महामार्ग ओलांडावा लागत असल्याने अनेकदा अपघाताने वन्य प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे पिण्याच्या पिण्यासाठी पळसदेवच्या तलावात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.