वाघोली (पुणे) – करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य सुविधा अधिक प्रभावी करून नागरिकांना वेळेत सुविधा द्याव्यात. त्याच प्रमाणे रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याच्या हेतूने लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे, अशी मागणी भाजप नेते तथा पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
याबाबत भाजप नेते दादासाहेब सातव पाटील यांनी सांगितले की, सध्या राज्यामध्ये करोनाचा वाढता प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शासन वाढत्या प्रभावाला अंकुश मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्य शासनाच्या वतीने सध्या लसीकरण मोहीम राबवली जात आहे. लसीकरण मोहीम (दि. 30) एप्रिल पर्यंत प्रभावीपणे राबवून एक मे नंतर 18 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी देण्यात येणारा लसीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याची गरज आता निर्माण झाली आहे. रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्या म्हणण्यानुसार या लसीकरणाचा फायदा रोग प्रतिकारक क्षमता वाढण्यास होत आहे. तसोच नागरिकांच्या जीविताला धोका होण्याची चिन्हे त्यामुळे कमी प्रमाणात दिसत आहेत. यामुळे जास्तीत जास्त वेग वाढवून नागरिकांना लसीकरणाचा लाभ देण्यासाठी गावोगावी स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था तसेच इतर प्रशासकीय विभागांना मदतीला घेऊन या लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आता निर्माण झाली असल्याचे भाजप नेते सातव पाटील यांनी सांगितले.