नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील अपुऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावर दिल्ली हायकोर्टाने केंद्रतील मोदी सरकारवर ताशेरे मारले आहेत. त्यांनी म्हटले आहे की ऑक्सिजनअभावी औद्योगिक उत्पादन थांबले तर काही नुकसान होणार नाही पण ऑक्सिजनअभावी रुग्णांना असे तिष्टत ठेवणे हे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे.
दिल्लीतील करोना पेशंटला पुरेसा ऑक्सिजन पुरवला जात नाही ही गंभीर बाब आहे, असे हायकोर्टाने म्हटले आहे. हायकोर्टाच्या संबंधित खंडपीठाने म्हटले आहे की, आम्ही असे ऐकले आहे की गंगाराम हॉस्पिटलमधील रुग्णांना त्यांच्या गरजेइतका ऑक्सिजन पुरवला जात नाही, त्यासाठी ऑक्सिजनच्या तुटवड्याचे कारण दिले जात आहे. दिल्लीतील ऑक्सिजन पुरवठ्यासाठी ज्या काही उपाययोजना करता येणे शक्य आहे ते उपाय योजा, अशा सूचनाही हायकोर्टाने सरकारच्या वकिलाला केल्या.