देशात सर्वाधिक अपघात 6 ते 9 या वेळेत
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाचे निरीक्षण
पुणे – भारतामध्ये सायंकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीमध्ये सर्वांत जास्त अपघात होतात, असे निरीक्षण केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने नोंदविले आहे. दुपारी तीन ते रात्री 9 या कालावधीमध्ये गाडी सावधपणे चालविणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष देखील मंत्रालयाने नोंदविला आहे. सायंकाळी होणाऱ्या अपघातांमध्ये अतिवेग हे मुख्य कारण असते. यासह अंधारामुळे वाहनांचा, रस्त्यांचा अंदाज न येणे, रिफ्लेक्टर नसल्याने अपघात होणे, रस्त्यावरील गर्दी ही काही प्रमुख कारणे असल्याची शक्यता अभ्यासकांकडून वर्तविण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक विभागाने भारतातील सन 2018 मध्ये घडलेल्या अपघातांचा अहवाल प्रसिद्ध केला असून, यामध्ये भारतातील अपघातांचे विश्लेषण केले आहे.
सन 2018 मध्ये भारतातील 4 लाख 67 हजार 044 अपघातांपैकी 18.6 टक्के अपघात सायंकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीत झाले असल्याचे नमूद केले आहेत. केवळ सन 2018 मध्येच नव्हे, तर सन 2014 पासून 17 टक्क्यांहून अधिक अपघात या वेळेमध्ये झाले आहेत. तर रात्री 12 ते मध्यरात्री तीन वाजेवाजेपर्यंत 5.4 टक्के अपघात झाले असल्याची नोंद केंद्रीय मंत्रालयाच्या अहवालामध्ये केली आहे.
तर महाराष्ट्रातील 35 हजार 717 अपघातांपैकी 6 हजार 112 अपघात सायंकाळी 6 ते 9 या कालावधीत झाले आहेत. तर 5 हजार 880 अपघात दुपारी तीन ते सायंकाळी सहा या कालावधीमध्ये झाले आहेत. यासह 2 हजार 456 अपघात पहाटे तीन ते सकाळी सहा या कालावधीत झाले आहेत. सायंकाळी 5 ते 7 यावेळेत नोकरदार वर्ग, कामगार वर्ग आपले दिवसभराचे काम आटोपून घरी परत असतात. त्यावेळी रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. यावेळी अपघात जास्त प्रमाणात घडतात असे दिसून आले आहे.