कोलकाता – भारताचा महान टेनिसपटू लिएंडर पेस याने करोनाच्या धोक्यामुळे लांबणीवर टाकण्यात आलेली ऑलिम्पिक स्पर्धा होणार का, अशी साशंकता व्यक्त करतानाच कारकिर्दीचा शेवट याच स्पर्धेत पदक जिंकून करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली व लहानपणापासून पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. देशाकडून आंतरराष्ट्रीय तसेच ग्रॅण्डस्लॅम आणि ऑलिम्पिक स्पर्धेत खेळता आले व सरस कामगिरीही करता आली याचे समाधान आहे. आता कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर असून टोकियोत पदक जिंकूनच निवृत्ती घेणार, असा निर्धार पेसने व्यक्त केला.
कारकीर्द ऐन भरात असताना जीवघेण्या आजारातून पूर्ण बरा झालो ते परमेश्वरी कृपा व चाहत्यांच्या प्रार्थनांमुळे. देशातीलच नव्हे तर परदेशातील चाहत्यांनी खूप प्रेम दिले. खेळाला दादही दिली व प्रोत्साहनही दिले. आता वयाच्या 47 व्या वर्षीदेखील पूर्ण तंदुरुस्त असून ऑलिम्पिक
स्पर्धेत खेळण्याची व त्यात पदक प्राप्त करण्याचे लक्ष्य आहे. ज्या काळात देशाकडून टेनिस खेळायला सुरुवात केली तेव्हा भारतात टेनिसला फार बरे दिवस नव्हते. ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा पाहिल्या जात होत्या. मात्र, भारतीय टेनिसपटूंना म्हणावा तसा पाठिंबा मिळत नव्हता तसेच फारशी संधीही मिळत नव्हती. मात्र, देशात क्रीडासंस्कृती रुजण्यास सुरुवात झाली व 1995 नंतर परिस्थिती बदलली. आता देशात अनेक खेळांना सुगीचे दिवस आले आहेत. 2004 नंतर ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही भारतीय खेळाडूंनी पदके जिंकून आपली गुणवत्ता सिद्ध केली. आता टोकियोत देखील खेळाडू यशस्वी होतील, असा विश्वासही पेसने व्यक्त केला.
ऑलिम्पिकबाबत साशंकता
करोनाचा धोका वाढल्याने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, करोनाचा धोका कधी संपुष्टात येईल हे आजही कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे पुढील वर्षी तरी ही स्पर्धा होईल का, याबाबत मला शंका आहे, अशी भीतीही पेसने व्यक्त केली.