नवी दिल्ली – अमेरिकेत सध्या करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनी मास्क उतरवले आहेत. सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन अर्थात सीडीसीच्या सूचनेनंतर अमेरिकेने मोकळा श्वास घेतला आहे.
मात्र अमेरिकेप्रमाणे सध्या भारतातील वातावरण तसे नाही. त्यामुळे भारतात जरी दोन्ही डोस घेतले असतील,तरी मास्क लावणे आवश्यक असल्याचे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.
मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. दुसऱ्या लाटेत व्हायरसचे नवे रुप समोर येत आहे. त्यातच म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. म्हणून भारतात मास्कमुक्ती केली जाऊ नये असे त्यांनी बजावले आहे.
भारतात करोनावर आपल्याला जोपर्यंत पूर्ण नियंत्रण मिळवता येत नाही, तसेच सगळी आकडेवारी आणि डेटा आपल्यासमोर येत नाही तोपर्यंत आपल्याला सगळे नियम पाळावेच लागणार असल्याचे गुलेरिया यांनी स्पष्ट केले. विषाणूत बदल घडत असल्याने लस त्यावर किती प्रभावी ठरतेय हे सांगता येउ शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.