सातारा – भरधाव वेगाने निघालेली चारचाकी पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे येथे पलटी झाल्याने आठ वर्षांची बालिका जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, मृत बालिका कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील असून अनया सुनील चौगुले (वय ८, रा. कसबा सांगवा) असे तिचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, सुनील चौगुले हे पत्नी आणि मुलीसमवेत चारचाकीने पुणे येथे नातेवाइकांकडे गेले होते. सोमवारी सकाळी ते पुण्याहून कोल्हापूरकडे निघाले होते. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ते भरधाव वेगाने शेंद्रे येथे आले असताना समोर असणाऱ्या पिकअप टेम्पोला ओव्हरटेक करत असताना त्यांची चारचाकी पलटी झाली आणि थेट नाल्यात जावून पडली. यात पाठीमागे बसलेल्या अनयाचा डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीचा मृत्यू झाला.
सुनील चौगुले आणि त्यांच्या पत्नीने सीटबेल्ट लावला असल्यामुळे दोघेही बचावले. ते दोघेही जखमी झाले आहेत.दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस ठाण्यातील हवालदार संजू गुसिंगे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.