नवी दिल्ली – विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा घेतलेला निर्णय पूर्ण विचार करुन घेतला असेल. कायमस्वरुपी कोणीही कर्णधार राहात नाही. बदल हे स्वीकारलेच पाहिजेत. कर्णधारपद हा काही जन्मसिद्ध अधिकार नसतो, असे परखड मत भारताचा माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे.
आता भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर कोहली प्रथमच अन्य कोणाच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिका खेळणार आहे. अशा परिस्थितीत त्याची भूमिका कशी असेल यावर प्रत्यक्ष कामगिरी पाहिल्यावरच मत करणे योग्य ठरेल.
मात्र, आता तो कर्णधार नसल्याने वेगळे काही करण्याची व बोलण्याची गरज नाही. आता त्याने त्याच्या फलंदाजीचा पुरेपुर आनंद घेतला पाहिजे व संघाच्या विजयासाठी मोलाची भूमिका वठवली पाहीजे, असेही गंभीरने सांगितले.
कोहलीने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर निवड समितीने त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरूनही हचवले व रोहित शर्माला एकदिवसीय सामन्यांच्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले. मात्र, रोहितने दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली असल्याने एकदिवसीय मालिकेसाठी लोकेश राहुल कर्णधार असेल.
कदाचीत या मालिकेपासून आपण नवीन कोहलीला पाहणार आहोत. त्याने खूप काही सिद्ध केले आहे. आता नव्याने त्याला काहीही करण्याची गरज नाही. उलट त्याने आता त्याच्या वैयक्तीक कामगिरीकडे जास्त लक्ष दिले पाहीजे. या मालिकेत त्याने धावा केल्या तर पुन्हा एकदा तो जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवू शकतो, असेही गंभीर म्हणाला.