आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्स संघाला अव्वल खेळाडू असूनही प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. याला जी काही कारणे आहेत, त्यातील मुख्य कारण म्हणजे कर्णधार ऋषभ पंत. त्याच्याकडे नेतृत्व देण्यामागे संघ व्यवस्थापन व संघ मालकांनी नक्की काय विचार केला होता हे न उलगडणारे कोडे आहे. या संपूर्ण स्पर्धेत ना त्याच्या नेतृत्वात चमक दिसली ना त्याच्या कामगिरीत.
गेल्या मोसमात श्रेयस अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेत खेळणार नव्हता त्यामुळे पंतला कर्णधारपद दिले गेले. यंदा त्याच्याकडेच कर्णधारपद कायम राखले गेले. मात्र, गेल्या मोसमातील चुकांमधून तो काहाही शिकू शकला नाही हेच त्याच्या व त्याच्या संघाच्या कामगिरीवरून स्पष्ट दिसले. या स्पर्धेत पंतने आपल्या खेळीच्या किंवा आपल्या नेतृत्वाच्या जोरावर संघाला सातत्याने विजय मिळवून दिले असे कधीही जाणवले नाही. तोच नेहमी गोंधळलेला दिसला. चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व सोपवल्यावर रवींद्र जडेजाचा जो विदूषक झाला तेच पंतबाबतही घडले. फरक इतकाच की जडेजाने प्रामाणिक प्रयत्न केले व पंतने नेहमीप्रमाणे बेजबाबदार वृत्तीचेच दर्शन घडवले.
याच पंतवर सातत्याने विश्वास ठेवून विराट कोहली व रोहित शर्माने त्याचे भारतीय संघातील स्थान कायम राखले तसेच दिल्ली संघानेही त्याला सतत संधी दिली मात्र, जबाबदारी व नेतृत्वाचे भान त्याच्या खेळातच नव्हे तर देहबोलीतून एकाही सामन्यात दिसले नाही. पूर्वी तो केवळ एक खेळाडू म्हणून जेव्हा संघात होता, त्यावेळी त्याचा फलंदाजी करतानाचा धांदरटपणा खपून जायचा पण कर्णधार बनल्यावरही त्यात फरक पडला नाही हे त्याचे, संघाचे तसेच त्याच्यावर विश्वास ठेवत असलेल्या सगळ्यांचेच चुकले.
एक आक्रमक फलंदाज व यष्टीरक्षक म्हणून तो संघात आला व त्याच्या बेजबाबदार खेळाला कायमच पाठीशी घातले गेले. त्याने त्याचा नैसर्गिक खेळ करावा असेच सातत्याने म्हटले गेले व त्यामुळेच तो शेफारला. आज त्याच्या चुकांचा फटका केवळ भारतीय संघाला किंवा दिल्ली कॅपिटल्सलाच नाही तर संघातील नवोदित खेळाडूंनाही बसला.
आता विचार केवळ दिल्ली कॅपिटल्सने नव्हे तर बीसीसीआयनेही केला पाहिजे, अशा खेळाडूला ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला घेऊन याजायचे की दीनेश कार्तिकला संधी द्यायची. कारण केवळ गुणवत्ता असून चालत नाही ती दिसावीही लागते आणि कार्तिकने हे सातत्याने सिद्ध केले आहे.