नवी दिल्ली – परदेशी नागरिकांच्या विरोधात होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये राजधानी दिल्ली आघाडीवर आहे. अशा स्वरूपाच्या एकूण गुन्ह्यांपैकी 30.1 टक्के गुन्हे तेथे नोंदवले गेले आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र (11.7) आणि कर्नाटकचा (11.2) यांचा समावेश आहे.
परदेशी नागरिकांची हत्या, बलात्कार आणि चोरी यांसह 409 गुन्हे गेल्या वर्षभरात दाखल झाले. 2018 मध्ये ते 517 तर 2017 मध्ये 492 होते, अशी माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने दिली आहे. त्यापैकी 123 गुन्हे दिल्लीत तर महाराष्ट्रात 48 आणि कर्नाटकात 26 गुन्हे नोंदवले गेले.
त्यापाठोपाठ तामिळनाडूत 5.6 टक्के, गोवा आणि उत्तर प्रदेश (दोन्ही 5.1 टक्के) हरियाणात (4.6 टक्के) राजस्थानात (3.9 टक्के) केरळ आणि आसाम ( दोन्ही 3.7 टक्के) मध्य प्रदेश (3.2 टक्के) असे या गुन्ह्यांचे प्रमाण आहे.
गेल्या वर्षभरात खुनाचे 13 गुन्हे, 12 बलात्काराचे गुन्हे, पाच अपहरणाचे गुन्हे नोंदवण्यात आले. 142 गुन्हे चोरीचे 41 फसवणुकीचे तर 26 महिलांना मारहाणीचे गुन्हे नोंदवण्यात आले असल्याचे अहवालात म्हटले आहे.
खुनांच्या गुन्ह्यात घट
2019 मध्ये दररोज देशात 79 जणांची हत्या करण्यात आली. वर्षभरात 28 हजार 918 खुनाच्या घटना घडल्या. 2018मध्ये ही संख्या 29 हजार 17 होती. हे प्रमाण 0.3 टक्क्यांनी घटले आहे.