भाटघर, दि. 12 (वार्ताहर) – गेल्या चार महिन्यांपासून भाटघरच्या पश्चिम दिशेस बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाळीव प्राण्यांवर हल्ला होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
भाटघर धरणाच्या पश्चिम दिशेस बिबट्याचा जास्त वावर होताना दिसत आहे. या परिसरात बिबट्यांच्या पिल्लांचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात बिबट्यांची जास्त संख्या असण्याची शक्यता आहे. वन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर नागरिकांनी चर्चा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. भाटघर धरणाच्या पश्चिमेस असणाऱ्या कुंबळे, गोपे, चांदवणे या गावांमध्ये बिबट्याने हल्ले केले आहेत.
गेल्या चार महिन्यात एक बैल, एक गाय, पाच शेळ्या फस्त झाल्या आहेत, तर एका वासरावर रविवारी (दि. 8) दिवसाढवळ्या हल्ला केला आहे. दोन महिन्यापूर्वी मळे परिसरात तीन बकऱ्यांवर बिबट्याने ताव मारला. अलीकडच्या काळात अशा घटना वारंवार होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परतीच्या पावसाने अगोदरच शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. यामुळे भात पिकाच्या उत्पादनावर फरक पडला आहे, तर दुसरीकडे बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाला आहे.
वनाधिकाऱ्यांचा संपर्क नाही
पुणे जिल्ह्यात शिरूर, जुन्नर या तालुक्यातून बिबट्या जेरबंद केल्याचे वृत्त प्रसारित होत असते. मग भाटघर परिसरात बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा का मिळत नाही, असा सवाल भोरकर करीत आहेत. याबाबत माहिती घेण्यासाठी वनविभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होत नाही.
मळे (ता. भोर) परिसरात दोन महिन्यांपूर्वी बिबट्याने दहशत निर्माण केली होती. यावेळीही आम्ही बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाशी चर्चा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती.
– काळूराम मळेकर, माजी सरपंच, मळे (ता. भोर)