राजगुरुनगर – उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपुर खेरीमध्ये शेतकऱ्यांना मंत्राच्या मुलाने अमानुषपणे गाडीखाली चिरडल्याचा निषेध करण्यासाठी खेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राजगुरूनगर येथील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आज (दि.११) रात्री ८ वाजता कँडल मार्च मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
खेड तालुका काँग्रेस कमिटी खेड तालुका यांचे वतीने केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी कँडल मार्च मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व खेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय डोळस यांनी केले. यावेळी पस माजी सदस्य किरण आहेर, माजी उपसभापती सतीश राक्षे, जिल्हा महिला अध्यक्षा वंदना सातपुते, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष सुभाष गाढवे, भीमशक्ती तालुका अध्यक्ष अनिल जाधव, उपध्यक्ष किशोर डोळस, ऋषिकेश डोळस,विलास रोकडे, इस्लम तांबोळी, यांच्यासह शेतकरी काँग्रेस, भीमशक्ती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
तालुका अध्यक्ष विजय डोळस म्हणाले, आज पुकारलेला महाराष्ट्र बंद यशस्वी झाला आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. त्यांच्यासाठी पंजाब हरियाणातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकार शेतकरी, कामगार विरोधी धोरण राबवित आहे. करोना काळात अनेकांचे संसार उध्वस्त झाले मात्र केंद्राकडून उपाययोजना केली जात नाही. उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपुर खेरीमध्ये 4 शेतकऱ्यांना मंत्राच्या मुलाने अमानुषपणे गाडीखाली चिरडले. या घटनेचा काँग्रेसच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.
डोळस पुढे म्हणाले, देशातील महत्वाच्या कंपन्या मोदी सरकारने विकायला काढल्या आहेत. मोदी सरकारने गुलामगिरीचे राज्य चालवत असून लोकशाही चिरडण्याचे काम करीत आहे. “अच्छे दिन गेले कोठे?” ८ शेतकऱ्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मंत्र्यांच्या मुलाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आमचे आंदोलन आहे.
यावेळी जिल्हा महिला अध्यक्षा वंदना सातपुते, पंस माजी उपसभापती सतीश राक्षे यांनी मनोगत व्यक्त केले. मागण्यांचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांना देण्यात आले. आभार अनिल जाधव यांनी मानले.