पुणे (प्रतिनिधी) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला. त्यात यापूर्वी घेण्यात आलेल्या “एमपीएससी’च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार पुन्हा राज्य सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट होत आहे. एवढेच नव्हे, उत्तीर्ण उमेदवारांची पूर्वीच्याच पदावर निवड झाली आहे. त्यामुळे यापूर्वी उत्तीर्ण होऊनही आताच्या परीक्षेतही उत्तीर्ण उमेदवारांकडून जागा अडविले जात असल्याचा प्रकार समोर येत आहे.
“एमपीएससी’तर्फे विविध पदांसाठी 13 ते 15 जुलै 2019 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत यापूर्वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आणि सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांची निवड झाली आहे. त्यात काही उमेदवारांना वरचे पद मिळाले. मात्र, पूर्वी मिळालेल्या पदापेक्षा काहींना कनिष्ठ पद मिळाले. पूर्वी उपजिल्हाधिकारी व तहसिलदार पदी निवड झालेल्या उमेदवारांची पुन्हा त्याच पदावर निवड झाल्याने या उमेदवारांनी अन्य जागा अडवल्या आहेत, असे काही स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात एमपीएससी समन्वय समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देत, या विषयाकडे लक्ष वेधले. राज्य सेवेचा निकाल जाहीर झाला. त्यात काही 2017 मध्ये उपजिल्हाधिकारी झालले परत त्यांनी परीक्षा देऊन ते 2019 मध्ये पुन्हा उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली आहे. काही 2017 मध्ये तहसीलदार झाले आहेत, त्यांनी परत परीक्षा देऊन या निकालातही पुन्हा तहसीलदार झाले आहेत. त्यांच्यामुळे अन्य उमेदवारांची निवड होऊ शकली नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रतिक्षा यादी जाहीर करा…
पूर्वीचे उत्तीर्ण उमेदवार याही परीक्षेत उत्तीर्ण होतात. मात्र काही उमेदवार तेच पद स्वीकारत नसतात. त्यामुळे काही पद रिक्त राहतात. अशा परिस्थितीत अन्य परीक्षांप्रमाणे राज्य सेवा परीक्षेचीही प्रतीक्षा यादी लावण्यात यावी. ज्यामुळे रिक्त पदावर अन्य उमेदवारांना संधी मिळेल. त्यांना न्याय मिळेल. त्यामुळे प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणे महत्त्वाचे आहे, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर यांनी केली आहे.