मुंबई – ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या स्ट्रॉंग रुममध्ये उमेदवारांना प्रवेश देण्यात येवू नये, अशी मागणी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.
आयोगाच्या या यशस्वी कार्याला एका निर्णयाने गालबोट लागले, असे दुर्दैवाने नमुद करावेसे वाटते असे सांगतानाच लोकसभेच्या निवडणुका लढविलेल्या उमेदवारांना या सीलबंद मशिन्स व व्हीव्हीपॅट ठेवलेल्या स्ट्रॉंग रुममध्ये थेट आतमध्ये जाण्यासंबंधी दिल्या गेलेल्या परवानगीच्या निर्णयाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. याचा आम्ही निषेध करीत असून यावर तातडीने पुनर्विचार करुन उमेदवारांना या स्ट्रॉंग रुममध्ये जाण्यास दिलेली परवानगी रद्द करावी, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.
सीलबंद मशिन्स जवळ उमेदवाराला जाण्याचे कोणतेही कारण नसते. ईव्हीएम मशीनमधील डेटामध्ये दुरुस्ती करून मतदान प्रक्रियेत बदल केला जावू शकतो, अशी भीती व्यक्त करतानाच याबाबत विरोधी पक्षांनी सबळ पुरावे सादर केले आहेत. शिवाय विरोधी पक्षांनी आपले आक्षेपही वेळोवेळी नोंदवले आहेत, याकडेही जयंत पाटील यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.