निवडणूक आयोगाला पत्र
नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसचे 40 आमदार आपल्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केल्यावरून त्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. घोडेबाजार सूचित करणारे वक्तव्य करून निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल मोदींची वाराणसीतील उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी तृणमूलने केली आहे. तसे पत्र पक्षाने निवडणूक आयोगाला पाठवले आहे.
पश्चिम बंगालमधील सभेत बोलताना मोदींनी तृणमूलचे आमदार संपर्कात असल्याचे म्हटले होते. ते आमदार लोकसभा निवडणुकीत भाजप विजयी झाल्यावर तृणमूलला रामराम ठोकतील, असा दावाही मोदींनी केला. त्यावर आक्षेप घेत तृणमूलने कठोर कारवाईची मागणी करणारे पत्र निवडणूक आयोगाला पाठवले आहे. पश्चिम बंगालमधील मतदारांना प्रभावित करण्यासाठी मोदी खोट्याचा आधार घेत आहेत. त्यांचे वक्तव्य अवैध आणि अयोग्य आहे. त्या वक्तव्याची पुष्टी करणारा पुरावा आयोगाने मोदींकडून मागावा. पुरावा देण्यात अपयश आल्यास त्यांची लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी रद्द केली जावी, अशी मागणी तृणमूलने पत्रात केली आहे. तृणमूलच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही एका सभेत बोलताना पक्षाच्या मागणीची री ओढली.