पाथर्डी (प्रतिनिधी) -करोनाच्या पार्श्वभूमीवर मढी व मायंबा येथील कावड यात्रा व अन्य धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक समारंभ रद्द करण्यात आले आहेत. तसेच शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय येत्या 31 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी तालुक्यात होणार आहे.
याबाबत मढी देवस्थान समितीच्या कार्यालयात प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील यांनी तातडीची बैठक घेतली. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, माजी सरपंच देविदास मरकड, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार, विश्वस्त अप्पासाहेब मरकड, व्यवस्थापक बाबासाहेब मरकड आदी उपस्थित होते.
मढी यात्रेचा शेवटचा टप्पा फुलोर बाग यात्रा नावाने ओळखला जातो. या दिवशी किमान 20 हजार कावडीधारक भाविक पायी चालत पाणी आणतात. मानाच्या सहा गावांचे निशाण (ध्वज) नाथांच्या पालखीचे गावातील लक्ष्मीमाता मंदीराजवळ भेट होऊन त्यानंतर पहाटेपर्यंत कावडीचा पाण्याचा जलाभिषेक नाथांच्या समाधीवर होतो. पाडव्याच्या पहाटे समाधी सुगंधी उठणे लेपन करून महापूजेने यात्रेची सांगता होते. तालुका प्रशासन व देवस्थान समितीचे चर्चेतून यात्रेचा रंगपंचमीचा टप्पा पार पडला. वाहतूक कोंडी, भाविकांना मास्कचा अभाव, लोकनाट्य तमाशा कार्यक्रम, काठ्याच्या मिरवणुका यामुळे मोठी गर्दी दिवसभर होती.
वारंवार आदेश देऊनही मास्कचा वापर अभावाने झाला. या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने आज पुन्हा तातडीची बैठक घेऊन देवस्थान समितीला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रत देऊन त्यावर चर्चा केली. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी देवस्थान समिती करेल, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी दिली.
माजी सरपंच देवीदास मरकड म्हणाले, देवस्थान समितीने यात्रा भरण्याचा अट्टाहास धरून गावकऱ्यांच्या जीवाशी खेळू नये. अन्यथा ग्रामस्थांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधू. तालुका प्रशासनाने खंबीर भूमिका घ्यावी. गडाचा ताबा अमावस्याच्या दिवशी पोलिसांनी घ्यावा. ग्रामपंचायतीने तातडीने व्यवसायिकांना नोटीस देण्यास सुरुवात केली आहे.
मायंबा देवस्थान समितीची तातडीची बैठक मच्छिंद्रनाथ गडावर देवस्थान समितीचे कार्यालय झाली. यावेळी आमदार सुरेश धस, देवस्थान समितीचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के,सावरगावचे सरपंच राजेंद्र म्हस्के यासह सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. शासन निर्णयानुसार समाधी सोहळा संपन्न होणार नाही.
याऐवजी सर्व विश्वस्त, ग्रामस्थ फक्त पहाटे समाधीचे पूजन करतील. गावातील भाविक कावडी आणून समाधी पूजन करतील. अन्य भाविकांना प्रवेश मिळणार नाही. कोणत्याही स्वरूपाची गर्दी जाणार नाही.मंदिराचा ताबा सुरक्षायंत्रणा कडे असेल असा निर्णय घेण्यात आला. अमावस्येला मायंबा येथे राज्याच्या विविध भागातून सुमारे दोन लाख भाविक येतात. त्यामुळे साथ रोगाचा धोका वाढण्याची शक्यता पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अमवस्येला मढी, मायंबा, वृध्देश्वर येथे संपूर्ण परिसरात लाखो भाविक दर्शन घेत पहाटे गावी निघून जातात. यात्रा बंद झाल्याने भाविकांमध्ये चर्चेचा विषय ठरला असून यावर्षी भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मायंबा देवस्थान समितीने केली आहे. असाच निर्णय गावपातळीवरील सर्व यात्रेवर बंधनकारक राहणार आहे. शहरातील सर्व शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश जारी केल्याचे गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी सांगितले.