पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे जुलै महिन्यापर्यंतच्या पाणीसाठ्याची चिंता मिटली आहे. सध्या शहरात पाणीकपात सुरु असून, दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. धरणातील पाणीसाठा लक्षात घेता, सुरू असलेली पाणीकपात रद्द करून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी रहाटणी येथील सामाजिक कार्यकर्ते मारुती थोपटे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
गेल्या वर्षीपासून पाणीकपातीच्या नावाखाली दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पावना धरणाची पातळी खालवली होती. मात्र ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावसाच्या दमदार हजेरीने धरण शंभर टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते.
पवना धरणाच्या क्षेत्रात अद्यापही परतीच्या पावसाचा जोर पहायला मिळत आहे. तर दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाण्याचा साठा करणे अनिवार्य ठरत आहे. पाणीसाठा केल्याने डेंग्यू, मलेरियासारखे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच, पाणीसाठ्यामुळे डेंग्यू, मलेरिया आजाराची साथ शहराला परवडनारी नाही. या सर्व बाबींचा विचार करून शहरातील पाणीकपात रद्द करून, दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी या निवेदनात केली आहे.