पिंपरी – सायबर हल्ल्याला टेक महिंद्रा कंपनीचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून महापालिकेने कंपनीचे कंत्राट रद्द करावे, अशी मागणी नगरसेविका सीमा सावळे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत टेक महिंद्रा, क्रिस्टल इंटिग्रेटीड सर्व्हिस आणि आर्सेस इन्फोटेक या कंपन्यांना काम दिले आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर सायबर हल्ला कऱण्यात आला. याबाबत टेक महिंद्रा कंपनीचे प्रोग्राम मॅनेजर महेंद्र लक्ष्मीनारायण लाठी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. नगरसेविका सावळे यांनी आरोप केला आहे की, या तक्रारीत कंपनीने सत्य परिस्थिती दडविण्याचा प्रयत्न केला आहे. अत्यंत विसंगत व दिशाभूल करणारी माहिती कंपनीने दिली आहे, असे तक्रारीतच दिसते.
कंपनी एकीकडे म्हणते की, रॅन्समवेअर हल्ल्यात चीन, रशिया, फ्रान्स व जर्मनी या देशातून कोणी अज्ञात व्यक्तीने सर्व्हर मध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे कंपनी मान्य करते की, अज्ञात व्यक्तीने सर्व्हर मध्ये प्रवेश करुन महत्वाचा डाटा इन्क्रिप्ट केला असून महत्वाचा डेटा डिक्रीप्ट करण्याकरीता बिटकॉईन द्वारे पैशाची मागणी करत आहेत. एकीकडे प्रयत्न झाला म्हणता आणि दुसरीकडे डेटा चोरला असे म्हणतात, हेच संशयास्पद आहे.
सावळे म्हणाल्या की, एकीकडे कंपनी माहिती लिक झाली नाही असे म्हणत आहे. तर दुसरीकडे 5 कोटींचे नुकसान झाल्याचे सांगत आहे. टेक महिंद्रा म्हणते की, एक पोर्ट ओपन राहिला असावा. याचाच अर्थ कंपनीचे दुर्लक्ष होते. 27 फेब्रुवारी 2021 ला सकाळी 11.15 ला सायबर हल्ला होतो. त्यानंतर गुन्हा चक्क 15 दिवसांनी म्हणजे 9 मार्च रोजी दाखल केला.