पुणे – सलग चार वेळा नगरसेवक राहिलेल्या, महापालिकेतील विविध समित्यांसह महापौर पदही भूषवलेल्या आणि कसबा विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार ‘मुक्ता टिळक’ यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. कर्करोगाने खासगी रुग्णालयात त्यांचं निधन झाले. त्या 57 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती शैलेश, मुलगी चैत्राली, मुलगा कुणाल, जावई, सून असा परिवार आहे. भाजपच्या अत्यंत धडाडीच्या, तळागाळासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ख्याती होती.
दरम्यान, मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. भाजपा मुक्ता टिळक यांच्या घरातूनच उमेदवारी देणार असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगू लागली आहे. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी दोन दिवसांपूर्वीच जाहीरपणे उमेदवारीचा दावा केला होता.
यावेळी ते म्हणाले, “दिवंगत आमदार मुक्ता यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी टिळक कुटुंबीयांपैकी एकाला उमेदवारी द्यावी, अशी भावना आहे. मीही उमेदवारीसाठी इच्छुक असून चिरंजीव कुणाल याचेही वेगळ्या माध्यमातून जनसंपर्काचे काम सुरू आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी टिळक कुटुंबीयांचा प्राधान्याने विचार करावा. पक्षाच्या नेत्यांशी अद्याप या संदर्भात चर्चा झालेली नाही. मात्र, ही भावना लवकरच नेत्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल. उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील’, असं ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, त्यांच्या या व्यक्तव्यानंतर आता भाजप नेते व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे. कसबा पेठेतील पोटनिवडणुकीसंदर्भात आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी ‘घरातून उमेदवारीवर’ चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना बोलून दाखविल्या.
कसबा पेठ मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजप घरातून उमेदवारी देणार का?असा सवाल चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावरून चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं. ते म्हणाले, “भाजपा घरातून उमेदवार देत नाही, असं कोण म्हणालं…’ असा प्रति सवाल त्यांनी केला. त्यामुळे घरातून उमेदवार उभा केला जाऊ शकतो, असे संकेत त्यांनी यावेळी दिले.