मुंबई – कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्य सरकारने तर शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह, मंगल कार्यालये, धार्मिक स्थळे बंद करण्याचे आदेश दिले. यातच कोरोना लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार आणि कामधंदा ठप्प आहे.अनेक पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कोरोना लॉकडाऊन संपल्यानंतरही आर्थिक संकट कायम राहणार आहे.
दरम्यान, येत्या काळात पालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे शाळांची फी भरतानाही पालकांपुढे मोठा प्रश्न उभा राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर विचार करून शिक्षण विभागाने यावर्षी फी वाढीला निर्बंध घालायचं ठरवलं आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी या बोर्डांच्या शाळांनीही फी वाढ करू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. या बोर्डाच्या अध्यक्षांशी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड चर्चा करणार आहेत. या बोर्डाच्या शाळा राज्य सरकारच्या अखत्यारित येत नसल्या तरी त्यांच्याशी चर्चा करून फी वाढ टाळता येईल का यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.