सातारा -माण तालुक्यात विकासाची गंगा आल्याचे अनेक नेते छातीठोकपणे सांगत असले तरी तालुक्यातील आगासवाडी हे गाव आजही रस्त्याच्या प्रतीक्षेत आहे. या गावातील लोकांना उर्वरित जगाशी संपर्क साधायचा असल्यास ओढे, नाल्यातून वाट शोधावी लागत असल्याचे भयानक वास्तव आहे. गेल्या साठ वर्षांत धड रस्ता नाही, तिथे बाकीच्या विकासाच्या कल्पना न केलेल्याच बऱ्या. आजवर अनेक पुढाऱ्यांनी या गावातील लोकांना रस्त्याची अश्वासने दिली; परंतु निवडणुकीच्या गुलालासोबत ही आश्वासने माणगंगेत वाहून गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे “कुणी रस्ता देताय का रस्ता’ अशी आर्त साद आगासवाडीकर घालत आहेत.
आगासवाडी हे माण तालुक्यातील डोंगरावर वसलेले छोटे गाव आहे. गावाच्या चारी बाजूंनी डोंगर आहेत. हे गाव माण तालुक्यात असले तरी तेथील ग्रामस्थांचे दैनंदिन व्यवहार खटाव तालुक्यातूनच होतात. येथील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने गावातील बहुसंख्य तरुणांनी पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईचा आसरा घेतला आहे. त्यामुळे गावात वृद्धांचा रहिवास अधिक आहे. केवळ शंभर ते सव्वाशे घरांची वस्ती आहे. या गावात खटाव तालुक्यातील कान्हरावाडीतून रस्ता जातो. हा रस्ता गेली अनेक वर्षे ओढ्यातून जात असल्याने गावात कोणतेही वाहन जात नाही. त्यामुळे गावकऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.
गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना अनेकदा साकडे घालूनही या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामस्थ यासाठी प्रयत्न करत आहेत. माजी आमदार दिवंगत सदाशिव पोळ, भाऊसाहेब गुदगे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी आगासवाडीकरांची मागणी पूर्ण करणे अपेक्षित होते; परंतु दुर्दैवाने तसे झालेले नाही. आगासवाडी हे गाव अनिल देसाई यांच्या जिल्हा परिषद गटातील असून सध्या या गटाचे नेतृत्व त्यांच्याच घरात आहे. कान्हरवाडी हे गाव विद्यमान सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या जिल्हा परिषद गटात येत असल्याने या नेत्यांनी रस्त्यासाठी आपली ताकद लावावी, अशी मागणी होत आहे.