अभाविपचे कृत्य असल्याचा आरोप; विद्यार्थी वर्गात संतापाची भावना
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये कवी रविंद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमधील विश्वभारती विद्यापीठात बुधवारी रात्री हिंसाचार उफाळला. विद्यापीठातील डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराला पंधरवडा उलटतो न उलटतो तोच केंद्रीय विद्यापीठात घडलेल्या या हल्ल्याने विद्यार्थ्यांच्यात संताप व्यक्त होत आहे.
या हल्ल्यात किमान दोन विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातही विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रूग्णालय प्रशासनाने प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याने तेथील हिंसाचार टळला.
हा हल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत अखलि भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे, असा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. समाज माध्यमांत याबाबत उलट सुलट माहिती पसरवली जात आहे. त्यात आलेल्या माहितीनुसार विद्या भवनमध्ये आलेल्या काही गुंडांनी भाजपाचे खासदार स्वपन दासगुप्ता यांना घेराव घालणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कोण सहभागी होते, याची चौकशी केली. त्यानंतर काही तासांनी आलेल्या बुरखाधारी गुंडाच्या टोळक्याने लोखंडी रॉड आणि विकेट घेऊन हल्ला चढवला. या हल्ल्याचे नेतृत्व अचिंत्य बागडी याने केल्याचे बोलले जात आहे.
याबाबत विद्यापीठाच्या आवारातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यात काही गुंड फुटलेल्या यष्टी दाखवत अंगावर धावून जात आहेत. या हल्ल्यामागे असणारी एक व्यक्ती कुलगुरूंची निकटवर्तीय आहे. तो कुलगुरूंच्या मोटारीतून विद्यापीठाच्या आवारात आला होता, असा आरोप केला जात आहे.
सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसने भाजपाशी संबंधित विद्यार्थ्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करत कुलगुरू आणि पोलिसांनी केलेल्या तातडीने कारवाईचे अभिनंदन करणारे टिवट केले आहे.
विश्व भारतीचे आवार आठ जानेवारीपासून धुमसत आहे. तेथे तेथे स्वपन दासगुप्ता हे भाषणासाठी येणार होते. मात्र विद्यार्थ्यांनी त्यांना घेराव घालत सेमीनार हॉलमध्ये तासभर कोंडून ठेवले होते. त्या घटनेचा बदला म्हणून हा हल्ला झाल्याचे एसएफआय आणि एआयटीएसओ या संघटनांचे म्हणणे आहे. हा हल्ला अभाविपने घडवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.