नवी दिल्ली : करोनामुळे जगातील अनेक देश लॉकडाउनमध्ये आहेत. त्यामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याची मोहिम सुरु झाली आहे. मालदीव आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या तीन युद्धनौका रवाना झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने याविषयी माहिती दिली. मुंबई किनाऱ्यावर तैनात असलेली एनएस जलाश्व, आयएनएस मगर या युद्धनौका सोमवारी रात्री मालदीवला रवाना झाल्या आहेत.आयएनएस शार्दुल दुबईला पाठवण्यात आली आहे. या तिन्ही युद्धनौका भारतात दाखल झाल्यानंतर कोचीमध्ये येतील अशी माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने दिली. आयएनएस मगर, आयएनएस शार्दुल या दक्षिण नौदल कमांडच्या तर आयएनएस जलाश्व पूर्व नौदला कमांडची युद्धनौका आहे.
अनेक भारतीय अन्य देशांमध्ये अडकले आहे. दरम्यान त्यांना टप्प्याटप्प्याने मायदेशी आणण्याची प्रक्रिया ७ मे पासून सुरू करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांमध्ये करोनाची लक्षणं नाहीत अशाच लोकांना परत आणण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तसेच त्यांना परत आणण्यासाठी विमाने तसेच नौदलाची मदत घेण्यात येणार आहे. परंतु प्रवासाचा खर्च मात्र संबंधित प्रवाशांनाच करावा लागणार आहे. भारतात परतल्यानंतर त्यांना १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहावं लागणार आहे.