मुंबई – मुंबई विद्यापीठातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमधील प्रशिक्षण शिबीर अर्ध्यातच रद्द करण्यात आले आहे. याबाबत राजीव सातव यांनी ट्वीट करत मंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर हे शिबीर रद्द करण्यात आले आहे. म्हाळगी प्रबोधिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याने राजीव सातव यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्याशी चर्चा केली आणि काल सकाळच्या सेशननंतर प्रशिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला.
मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये जर प्रशिक्षण होत असेल आणि त्यावर संशय व्यक्त होत असेल तर त्याची चौकशी करणे माझे काम आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर आणि सचिव यांच्याशी चर्चा केली. संशय निर्माण करणार प्रशिक्षण जर होत असेल तर ते थांबवले पाहिजे. त्यामुळे आम्ही काल सकाळच्या सेशननंतर दोन दिवसाचे प्रशिक्षण एक दिवसात त्वरित थांबवले, असे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले.
यशदा एवढं मोठं प्रशिक्षण केंद्र असताना तिथे आपण का प्रशिक्षण घेतोय? असा प्रश्न मी कुलगुरू यांना विचारला. त्यावेळी मागील सरकारमध्ये आधीच्या मंत्री महोदयांनी हा निर्णय घेतला होता, असे त्यांनी सांगितले.