करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात आणीबाणी लागू करावी, अशी मागणी बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी केली आहे. देशात आज हे होत आहे, उद्या काय होणार आहे? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सैन्याच्या मदतीची गरज व्यक्त केली. ऋषी कपूर यांनी सातत्याने करोनाविषयी आणि त्या परिस्थितीत सुरु असलेल्या उपाययोजनांवर आपली मतं ट्विटद्वारे रोखठोकपणे मांडली आहेत.
ऋषी कपूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज हे होत आहे, उद्या काय होणार आहे? म्हणूनच आपल्याला सैन्याच्या मदतीची गरज आहे, असे मला वाटते. ऋषी कपूर यांनी याआधी देशभरात सुरु असलेल्या बनावट आणि अस्वच्छ मास्कच्या उत्पादनावरही बोट ठेवले होते.
दरम्यान, ऋषी कपूर यांनी काही दिवसांपूर्वी दारुची दुकाने किमान संध्याकाळी सुरु करण्याची मागणी केली होती. करोनाच्या संसर्गाची भीती आणि लॉकडाऊनमुळे घरात बंद असल्याने लोक नैराश्यात आहेत. त्यामुळे त्यांना थोडा आराम मिळावा म्हणून दारुची दुकानं सुरु करा, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. यानंतर त्यांच्यावर टीकाही झाली होती.