महापालिका देणार 41 ठिकाणी सुविधा
पुणे – करोनाचा वाढता धोका लक्षात घेता महापालिकेकडून शहरातील पालिकेच्या सर्व भाजी मंडई बंद केल्या आहेत. दरम्यान, या निर्णयामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून शहरात 41 ठिकाणी भाजी संकलन केंद्र सुरू केली जाणार आहेत. या केंद्रांवरून नागरिकांना घरपोच भाजीपाला देण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. त्यासाठी जागा निश्चिती केली असून लवकरच त्याचा टोल फ्री क्रमांक जाहीर केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
शहरात राज्य शासनाने संचार बंदी लागू केली आहे. त्यामुळे पाचपेक्षा जास्त नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई केली आहे. मात्र, त्याचवेळी शहरातील अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या आहेत. त्यात भाजी, किराणा माल, औषधे तसेच इतर अत्यावश्यक साहित्यांचा समावेश आहे.
मात्र, राज्यात सोमवारपासून संचार बंदी लागू झाल्याने तसेच मार्केटयार्टातील अडत्यांकडून 25 मार्चपासून बाजार बंद ठेवण्याची घोषणा केल्याने मंगळवारी सकाळी महापालिकेच्या शहरभरात असलेल्या मंडईमध्ये गर्दी झाली होती.
त्यातच, पोलीस असूनही ही अत्यावश्यक बाब असल्याने ही गर्दी आटोक्यात येण्यास तयार नव्हती. त्यामुळे प्रशासनाकडून अखेर बुधवारी सर्व मंडई बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे भाजी न मिळाल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेने पर्यायी 41 ठिकाणी भाजी केंद्र सुरू केली जाणार आहेत.
घरपोच मिळणार भाज्या
शहरातील क्षेत्रीय कार्यालये, त्या भागात असलेली लोकसंख्या तसेच उपलब्ध जागा लक्षात घेऊन प्रशासनाकडून शहरात 41 ठिकाणी भाजी केंद्र प्रस्तावित केली जाणार आहेत. त्या ठिकाणी सर्व भाजीपाला एकत्र आणून त्यानंतर नागारिकांना टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून त्या क्रमांकावर फोन करून नागरिकांना आपली भाजीची मागणी नोंदविता येईल त्यानुसार, संबंधित ऑर्डर पॅक करून नागरिकांना घरपोच पाठविण्याचे नियोजन करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. सर्व यंत्रणा तातडीने उपलब्ध झाल्यास पुढील काही दिवसांत ही सुविधा सुरू केली जाणार आहे.