लखनौ: येत्या 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. त्या कार्यक्रमाला दलित महामंडलेश्वर कन्हैया प्रभुनंदन गिरी यांना निमंत्रित करण्यात यावे,अशी सूचना बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे.
देशात जातविरहित समाजरचना असावी असे घटनेचे उद्दिष्ट आहे. त्या हेतूसाठी त्यांना हे निमंत्रण दिले जावे अशी अपेक्षा त्यांनी केली आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला निमंत्रण न दिल्याबद्दल गिरी यांनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त काहीं वृत्तपत्रांमध्ये छापून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे.
ट्विटर संदेशात मायावती यांनी म्हटले आहे की, प्रभुनंदन गिरी महाजांनी त्यांना निमंत्रण न दिल्याबद्दल तक्रार केली आहे. त्यांनाही अयोध्येतील कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले गेले असते ते बरे झाले असते. त्याचा समाजावर चांगला परिणाम झाला असता असे त्यांनी म्हटले आहे.
गेले अनेक वर्षे दलित समाजाला अन्याय आणि उपेक्षा सहन करावी लागली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर दलितांनी डॉ. आंबेडकर यांची दाखवून दिलेल्या मार्गावरून आपला लढा सुरू ठेवावा असेही त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात नमूद केले आहे.