(सागर येवले) “स्मार्ट सिटी’च्या दिशेने प्रवास सुरू केलेल्या पुणे शहरात विद्युत खांबाला लटकलेल्या तसेच रस्ते आणि पदपथांवर पडलेल्या केबलचा फास पडला आहे. या अस्ताव्यस्थ पडलेल्या केबलमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून, वयोवृद्ध आणि लहान मुले अडकून पडल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. असे असतानाही संबंधित केबल कंपन्यांवर कारवाई होत नाही. जीव गेल्यावरच प्रशासन आणि कंपन्या जागे होणार का? शहराला तत्काळ या अनधिकृत केबलच्या विळख्यातून बाहेर काढा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
दोन दिवसांपूर्वी एक महिला पोलीस कर्मचारी दुचाकीवरून निघाल्या होत्या. खडकी-औंध रस्त्यावरील पशुसंवर्धन कार्यालयासमोर रस्त्यावर धोकादायक पद्धतीने लोंबकळत असलेल्या केबलमध्ये दुचाकीचे हॅन्डल अडकले आणि त्या खाली पडल्या. त्या जखमी झाल्या असून, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशा प्रकारच्या घटना शहरात दररोज घडत आहेत. रस्त्यावर पडलेल्या केबलमुळे दुचाकी घसरणे, रात्रीच्या वेळी पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होणे, काही वेळा या अडथळ्यामध्ये लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती पडल्याच्या घटनाही समोर आल्या. आजही शहरात विविध ठिकाणी या केबळ लोंबकळत किंवा अस्ताव्यस्थ पडलेल्या दिसून येतात.
सध्या चांदणी चौकात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या परिसरात मुख्य महामार्गावरील दुभाजकावर असलेल्या विद्युत खांबावर केबलचे जाळे पसरलेले आहे. तसेच पुलाला लटकविलेल्या केबल रस्त्यावर पडल्या असून, त्याकडे प्रशासनाचे किंवा त्या ठिकाणी काम करणाऱ्या ठेकेदाराचेही लक्ष नाही. लॉ-कॉलेज रस्त्यावर गुरूकुल जवळील पदपथावर केबल लोंबकळत आहेत. यांसह विविध ठिकाणी ही परिस्थिती पाहायला मिळते. या केबल मोबाइल कंपन्यांसह विविध विभागांच्या असल्याचे दिसून येते. मात्र, अपघात झाल्यावर ती केबल बाजूला करतात आणि “आमच्यामुळे काही झालेच नाही,’ असे दाखवतात. प्रशासनही कारवाई करत नाही. कारवाई केलीच तर ती जुजबी. मात्र, पुन्हा चूक होणार नाही, अशी अद्दल घडेल याप्रकरची कारवाई होताना दिसत नाही.
इमारतींबरोबरच केबलचे जाळे पसरते
शहरात इमारतींचे जाळे वाढले, तसतसे रस्ते मोठे झाले. मोबाइल, इंटरनेट यांसह विविध उपकरणांसाठी शहरात रस्ते खोदून केबल टाकण्यात आल्या. त्यामध्ये महावितरणच्या केबलही पदथावर दिसून येतात. मात्र, प्रामुख्याने मोबाइल आणि इंटरनेट संबंधित केबलचे जाळे पसरत असले तरी ते अस्ताव्यस्थ पसरलेले आहे. जिथे मिळेल त्या ठिकाणी केबल टाकली जात आहे, मात्र ती रस्त्यावर पडते, लोंबकळते याकडे कंपन्यांचे लक्ष नाही. त्यामुळे अपघात घडतात आणि नागरिक जखमी होतात. जीव गेल्यावर प्रशासन आणि केबल कंपन्या जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.