कोल्हापुर – महाराष्ट्र हे गोव्या सारखे छोटे राज्य नाही. या राज्यात सरकार केवळ नाममात्र स्थितीत अस्तित्वात आहे. त्यामुळे राज्याचे अनेक प्रश्न रखडले आहेत. त्यामुळे नवीन सरकारने त्वरीत पुर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात आणावे अन्यथा आता आम्हालाच मोर्चे काढावे लागतील असा इशारा येथील कॉंग्रेस नेते व माजी मंत्री सतेज पाटील यांनी राज्यातील शिंदे सरकारला दिला आहे.
हे मोठे राज्य केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेच मिळवून चालवू शकतील अशी स्थिती नाही असेही त्यांनी म्हटले आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात शिंदे यांचे सरकार सत्तेवर येऊन एक महिना झाला तरी अजून नवीन सरकार सत्तेवर आलेले नाही त्यावरून त्यांनी जोरदार निशाणा साधला. कोल्हापुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका शक्यतो आघाडी करून लढवल्या जातील पण ते जर जमले नाही तर आम्ही स्वबळावर या निवडणुका लढवण्याची तयारी ठेवली आहे असेही त्यांनी म्हटले आहे.