शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत खल
मुंबई (प्रतिनिधी)– महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सहा मंत्र्यांचा शपथविधी होऊन नऊ दिवस उलटले तरी संबंधित मंत्र्यांचा खातेवाटप व मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने आघाडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मात्र, आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर हा तिढा सुटला असून दोन दिवसांत म्हणजेच 9 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून त्याच दिवशी शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. तिन्ही पक्षांमध्ये सत्ता वाटपाचे सूत्रही निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत यांनी नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही त्यांना अद्याप खातेवाटप झालेले नाही. शिवाय मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. आठ दिवसांत फक्त मुख्यमंत्री व सहा मंत्र्यांना शासकीय बंगल्यांचे व मंत्रालयातील दालनांचे वाटप करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर वरळी येथील नेहरु सेंटरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात शुक्रवारी सायंकाळी बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई तर राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील उपस्थित होते. या बैठकीत सरकारमधील मंत्र्याचे रखडलेले खातेवाटप व उर्वरीत मंत्रिमंडळाचा विस्तार यावर दोन तास चर्चा झाली. मंत्र्यांना खातेवाटप न दिल्याने सर्वच विभागाचा भार सद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आहे.
मात्र, आगामी विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन पाहता येत्या दोन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. त्यानुसार 9 डिसेंबर रोजी राजभवन येथे नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असून त्याच दिवशी सर्व मंत्र्यांचे खातेवाटप ठरणार आहे.
आघाडीमधील तीन्ही पक्षांमध्ये सत्ता वाटपाचे सूत्रही निश्चित झाले आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाचा वाद सुटल्यानंतर आता सरकारमधील गृह, महसूल, सार्वजनिक बांधकाम खाते, नगरविकास, जलसंपदा विभाग हे कोणाला मिळणार हे अजूनही गुलदस्त्यात असून याचा उलगडा आता दोन दिवसांनी होणार आहे. किंबहूना, नागपूर अधिवेशन संपेपर्यंत गृह खाते उद्धव ठाकरे हे स्वत:कडेच ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.