नवी दिल्ली – राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहुर्त मिळाला असून येत्या 15 ऑगस्ट पुर्वी राज्यांतील मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. या पहिल्या टप्प्यातील विस्तारात किमान 15 मंत्री समाविष्ट केले जाणार आहेत अशी माहिती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महत्त्वपूर्ण गृहखाते राखतील, अशी शक्यता सूत्रांनी रविवारी व्यक्त केली. 30 जून रोजी हे नवीन सरकार अस्तित्वात आले. परंतु अजून त्याचा मंत्रिमंडळ विस्तार मात्र रखडला होता.
राज्यातील सत्ताबदलांच्या संबंधातील अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत आहेत. त्याच्या निर्णयासाठी हा विस्तार रखडल्याचे सांगितले जात होते. सध्या राज्य मंत्रिमंडळात केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी दोनच पदे भरली आहेत.
शनिवारी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मंत्रिपरिषदेच्या विस्ताराला झालेल्या दिरंगाईमुळे राज्य सरकारच्या कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही तथापि हा विस्तार लवकरच केला जाईल.
फडणवीस म्हणतात…
सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या अपात्रतेच्या कारवाईचा व मंत्रिमंडळविस्ताराचा काहीही संबंध नाही. सर्वोच्च न्यायालयाने मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यास मज्जाव केलेला नाही त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे फडणवीस यांनी रविवारी दिल्ली येथे बोलताना स्पष्ट केले आहे.
अजित पवारांना प्रत्युत्तर…
अजित पवार यांच्या घरी बसा टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनी थेट दिल्लीहून प्रत्युत्तर दिले. “माहिती असतानाही फक्त राजकारणासाठी डायलॉगबाजी केली जाते. गेल्या सरकारमध्ये अनेक सचिवांना अधिकार होते. त्याआधीही आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्र्यांनी सचिवांना हे अधिकार दिले होते. महाराष्ट्रात नव्हेत देशात ही पंरपरा आहे. सरकार जनतेचं असून, जनतेचे मुख्यमंत्री आहेत. जनताच महाराष्ट्रात निर्णय घेईल.” असं फडणवीस म्हणाले.