कोलकाता – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीबाबत स्पष्ट संकेत देताना भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितले आहे की, देशभर नागरिकत्व दुरुस्ती कायदा लवकरच लागू होईल. सीएएची अंमलबजावणीसुद्धा राज्यात होईल, असे नड्डा यांनी सांगितले. तुम्हाला नागरिकत्व दुरुस्ती कायदा मिळेल. तो मिळणे निश्चित आहे. सध्या या कायद्याचे नियम बनत आहेत. कोरोनामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीत काही अडचणी आल्या. मात्र जसजसा कोरोना कमी होत आहे. तसतसे नियम बनत आहेत. त्यामुळे सीएए मिळेल हे निश्चित आहे.
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसच्या कारभारावरही नड्डा यांनी हल्ला चढवला. येथे फोडा, झोडा आणि राज्य करा, असे काम सुरु असून येत्या विधानसभा निवडणुकीत नागरिकच बॅनर्जी यांना धडा शिकवतील, असेही नड्डा म्हणाले. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा हे एक दिवसाच्या दौ-यासाठी पश्चिम बंगालमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रस्तावित पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या संघटनात्मक तयारीची पाहणी केली.
नड्डा असेही म्हणाले की, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धोरण आहे. तर अन्य राजकीय पक्ष मात्र फूट पाडा, समाजाची विभागणी करा, वेगवेगळे करा, वेगवेगळ्या मागण्या करा आणि राज्य करा या धोरणावर चालतात. पश्चिम बंगालमधील सध्याचे सरकारही हेच करत आहे. सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची क्षमता केवळ मोदींमध्येच आहे.
यावेळी नड्डा यांनी केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी न केल्याबद्दल ममता सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होताच केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी आणि आयुष्मान भारत सारख्या योजना राज्यात लागू केल्या जातील. ममता बॅनर्जी यांनी किसान सन्मान निधी योजना राज्यात लागू न करणे ही दु:खद बाब आहे. त्यांनी राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित ठेवले आहे. त्याबरोबर आयुष्मान भारतही राज्यात लागू होईल.