दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्याला तीव्र विरोध करणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्यावर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी रविवारी तोफ डागली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी या कायद्यातील तरतुदींवर केवळ दहा ओळी बोलून दाखवाव्यात असे आव्हान त्यांनी केले.
सीएएच्या समर्थनार्थ भाजपने आयोजित केलेल्या “आभारप्रदर्शन”मध्ये नड्डा म्हणाले, “राहुल यांनी सीएएच्या तरतुदीवर केवळ १० ओळी बोलून दाखवावे. त्यांनी फक्त दोन ओळीत सांगावे सीएएमुळे देशाचे काय नुकसान होणार आहे . ते म्हणाले, “या देशाचे हे दुर्दैव आहे, जे भारताचे नेतृत्व करण्यास येतात त्यांना सीएएबद्दलची मूलभूत माहितीदेखील माहित नाही.
नड्डा म्हणाले, “देशातील सीएएविरोधात झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु राहुल गांधींनी नुकसानीसंदर्भात साधा निषेधसुद्धा नोंदवला नाही.
“कॉंग्रेस आणि भाजपा यांच्यात विचारधाराची लढाई होऊ शकते. एखाद्या विषयावरील आपली मते आमच्यापेक्षा वेगळी असू शकतात. परंतु हिंसाचारावर तुम्ही एक शब्द देखील बोलू नये हे कितपत योग्य आहे? असा टोला देखील त्यांनी राहून गांधींना मारला.सीएए कायद्याबाबत जनतेची दिशाभूल करुन विरोधक “व्होट बँकचे राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी कोंग्रेसवर केला.
नड्डा म्हणाले, “राहुल यांनीही १९४७ साली झालेल्या भारत विभाजनाचा इतिहास तरी वाचला आहे का? १९४७ साली हजारो नागरिकांना आपले प्राण वाचवण्यासाठी देश सोडून जावे लागले याचे तरी राहुल गांधी याना दुःख आहे का ?”शेजारच्या देशातून आलेल्या अल्पसंख्याकांना राहुल गांधी यांनी कधी भेटण्याचा प्रयत्न केला का?
या देशाची धर्माच्या आधारावर कॉग्रेसने विभागणी केली असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. काँग्रेसने आम्हाला कोणत्या धर्माबद्दल बोलावे हे शिकवू नये. आम्ही नेहमीच अल्पसंख्याकांना संरक्षण दिले आहे.
काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावे देशाचे विभाजन झाल्यांनतर पाकिस्तान,बांगलादेशातील अल्पसंख्याकांची संख्या का कमी होते आहे. याच उत्तर कोण देणार? आधीच्या काँग्रेस सरकारने सिंध प्रांतातून आलेल्या निर्वासितांना न्याय देण्यात उशीर केला असेही ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी स्प्ष्टपणे सांगितले आहे कि देशातील एकाही मुस्लिम नागरिकाचे नागरिकत्व काढून घेणे जाणार नाही.