पुणे – देशावर खूप मोठे ओझे झालेल्या बांगलादेशी घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न म्हणून “नागरिकता संशोधन कायद्या’ला (सीएए) काहीजण विरोध करत आहेत. अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी मंगळवारी केली.
डेक्कन एज्यूकेशन सोसायटी आणि पद्मावती प्रतिष्ठान यांच्या वतीने पद्मावती बनहट्टी यांच्या स्मृतिनिमित्त देवधर यांचे “नागरिकता संशोधन कायदा’ विषयावर व्याख्यान झाले. सोसायटीच्या परिषद आणि नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष महेश आठवले, नियामक मंडळाचे सदस्य आदेश गोखले, बनहट्टी प्रतिष्ठानच्या कौमुदी बनहट्टी यावेळी उपस्थित होत्या.
हिंदू बहुसंख्य असलेल्या आपल्या देशात अल्पसंख्याकांवर कधीच अन्याय झाले नाहीत. दुसऱ्या धर्माचा दुस्वास करायला आम्हाला शिकवले नाही. मुस्लिमांनी या देशाच्या श्रद्धास्थानांवर आक्रमण करून त्यांचे मॉडेल प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले. परंतु, त्यांना यश आले नाही, उलट सहजीवनाद्वारे इस्लामला आत्मसात करण्याचे काम हिंदूंनी केल्याचे इतिहास सांगतो. तरीही हिंदूंना जातीयवादी ठरवले जाते. हिंदूंना धर्मनिरपेक्षता शिकविण्याची गरज नाही, असे देवधर म्हणाले.
खिलाफत चळवळीपासून भारतातल्या मुस्लिमांना कॉंग्रेस पाठिंबा देत आली आहे. हे आंदोलन अयशस्वी झाल्यानंतर खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या हिंदूंशी मुस्लिमांनी दंगे केले. 1946 मध्ये देशातील निवडणुकीत कॉंग्रेसने अखंड भारताचा नारा दिला होता. मुस्लीम लीग पाकिस्तानच्या बाजूने होते. सत्ताप्राप्तीसाठी कॉंग्रेसने मुस्लीम लीगसमोर माथे टेकले. त्यामुळे धर्माच्या आधारावर फाळणी झाली, असे देवधर म्हणाले. उपप्राचार्य डॉ. आशिष पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. यशोधन महाजन यांनी परिचय करून दिला. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी आभार मानले.