नवी दिल्ली – सुधारित नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात निदर्शनांचे सत्र सुरूच असून भाजपच्या मित्रपक्षांनीही सीएए आणि एनआरसीविरोधात सूर आवळण्यास सुरुवात केली आहे. तसेच भाजपांतर्गतही या कायद्याविरोधात नाराजी असल्याचे दिसून येत आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यात मुस्लिमांचाही समावेश का नाही? असा सवाल भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकुमार बोस यांनी पक्षाला विचारला आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्याला होत असलेल्या विरोधानंतर हा कायदा मुस्लीमविरोधी नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील सभेत सांगितले होते. यावर चंद्रकुमार बोस म्हणाले कि, जर सीएए २०१९ कायदा कोणत्याही धर्माशी नाही. तर मग आपण हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी आणि जैन या धर्मांचा उल्लेख का करतो आहे? आपण मुस्लीम धर्माचा त्यात समावेश का केलेला नाही. चला पारदर्शक होऊ या, अशा शब्दात बोस यांनी पक्षालाच सुनावले आहे.
If #CAA2019 is not related to any religion why are we stating – Hindu,Sikh,Boudha, Christians, Parsis & Jains only! Why not include #Muslims as well? Let’s be transparent
— Chandra Kumar Bose (@Chandrabosebjp) December 23, 2019
दरम्यान, सुधारित नागरिकत्व कायद्यात मुस्लिमांचाही समावेश केला जावा, अशी मागणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबिरसिंग बादल यांनीही केली आहे. पत्रकारांनी त्यांना एनआरसीबाबत विचारले. त्यावर ते उत्तरले, एनआरसी काय आहे ते कुणालाच माहीत नाही. त्याविषयीचा तपशील समजू द्या. आताच काही बोलता येऊ शकणार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.