नवी दिल्ली : नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावरून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी देशात दंगली घडवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.
गृहमंत्री अमित शहा आज दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करीत होते. दिल्लीत झालेल्या हिंसक आंदोलनाला काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जबाबदार असल्याचे ते म्हणाले.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत विरोधकांनी जनतेची दिशाभूल करण्याचा केली. हिंसाचाराला विरोधकांनी खतपाणी घातल्याचा आरोप त्यांनी केला. १९८४ साली देशात शीखविरोधी दंगली झाल्या. त्या पीडितांना काँग्रेस सरकारने मदत केली नाही. पण मोदी सरकार सत्तेत येताच प्रत्येक पीडितेला पाच- पाच लाख रुपये नुकसान भरपाई आमच्या सरकाने दिली असल्याचे शहा म्हणाले.