महात्मा गांधींसह अनेकांची इच्छा पुर्ण केल्याचा केला दावा
नवी दिल्लीे – केंद्र सरकारने नुकताच संमत केलेला सीएए म्हणजेच नागरीकत्व सुधारणा कायदा ऐतिहासिक असून हा कायदा संमत झाल्याने आपल्या देशाच्या महात्मा गांधी यांच्यासह अन्य संस्थापक नेत्यांचे स्वप्न साकार झाले आहे असा दावा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज राष्ट्रपतींचे संसदेच्या दोन्हीं सभागृहापुढे अभिभाषण झाले त्यावेळी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
राष्ट्रपती म्हणाले की चर्चा आणि संवादाच्या माध्यमातूनच लोकशाही बळकट होत असते, पण हिंसक निदर्शनांमुळे लोकशाही कमकुवत होते.कलम 370 रद्द करण्यात आल्याच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की, जम्मू काश्मीर आणि लडाख या भागात राहणाऱ्या लोकांना देशातल्या अन्य नागरीकांप्रमाणेच हक्क मिळाल्याने लोकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
ते म्हणाले की देशात मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर आणि नवीन संसद गठीत झाल्यानंतर पहिल्या सात महिन्यात संसदेने अनेक महत्वाचे कायदे संमत करून देशात एक विक्रम केला आहे. माझे सरकार चालू दशक भारताचे दशक म्हणून ओळखले जावे यासाठी प्रयत्नशील असून हे नवे शतक भारताचे शतक म्हणूनही ओळखले जावे यासाठी प्रयत्नशील आहे.